अवघ्या 15 दिवसात ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’, शिंदे गटाचा मोठा झटका

| Updated on: Dec 06, 2023 | 9:02 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने ठाकरे गटाला मोठा झटका दिला आहे. काही दिवसांपूर्वी शिंदे गटातील एक बडा नेता ठाकरे गटात गेला होता. पण या नेत्याने अवघ्या 15 दिवसात घरवापसी केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या नेत्याचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला आहे. त्यामुळे हा शिंदे गटाचा ठाकरे गटाला मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे.

अवघ्या 15 दिवसात ठाकरे गटाला जय महाराष्ट्र, शिंदे गटाचा मोठा झटका
eknath shinde and uddhav thackeray
Follow us on

सुनील जाधव, Tv9 मराठी, मुंबई | 6 डिसेंबर 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन ठाकरे गटात दाखल झालेले भायखळा विभागातील पदाधिकारी संतोष कदम आणि प्राची कदम यांनी अवघ्या पंधरा दिवसात पुन्हा स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला आहे. या दोघांनी ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ करत पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी काल शिवसेना उपनेते तथा विभागप्रमुख यशवंत जाधव यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश संपन्न झाला.

पंधरा दिवसांपूर्वी काही गैरसमजातून संतोष कदम यांनी शिवसेना सोडून तडकाफडकी उबाठा गटात प्रवेश केला होता. त्यांच्या या निर्णयामुळे आनंदी झालेल्या ठाकरे गटाच्या नेत्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याहस्ते त्यांचा पक्षप्रवेश करून घेतला होता. या घटनेची शिंदे गटाला भायखळ्यात सुरुंग लागल्याच्या मथळ्याखाली ‘सामना’ वृत्तपत्रात बातमीही छापून आली होती. मात्र ही बाब यशवंत जाधव यांना कळताच त्यांनी फोन करून कदम यांच्याकडे हा निर्णय घेण्यामागील कारण विचारले. त्यावेळी त्यांना कदम यांच्या नाराजीचे कारण समजले. त्यांनी वेळीच याबाबत संबंधित व्यक्तीला योग्य ती समज देऊन संतोष कदम आणि प्राची कदम यांच्या मनातली नाराजी दूर केली.

संतोष कदम यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट आणि…

आपण तडकाफडकी घेतलेल्या निर्णयामुळे पक्षात चुकीचा संदेश गेल्याचे लक्षात आल्याने संतोष कदम यांनी यशवंत जाधव यांच्या मदतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यांनी आपली पक्षात पुन्हा सक्रिय होण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी तत्काळ त्यांचा पुन्हा पक्षप्रवेश करून घेतला. मुख्यमंत्र्यांनी त्यांना झाले गेले विसरून जात पुन्हा पक्षवाढीसाठी सक्रिय होण्यास सांगितले. त्यामुळे अवघ्या 15 दिवसांत ठाकरे गटात गेलेला पदाधिकारी ‘जय महाराष्ट्र’ करून पुन्हा शिवसेनेमध्ये सक्रिय झाल्याने शिंदे गटात आनंदाचं वातावरण आहे.

संतोष कदम यांच्यासह प्राची कदम यांच्यासह रेहान खंडवानी, ज्योती पाटील, रेश्मा काळे, मानसी सकपाळ, प्रिया कदम, अमित खानविलकर, विजय पवार, चैतन्य पाटील आणि अन्य कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठा गटाला पुन्हा एकदा एक जोर का झटका दिल्याची चर्चा भायखळा विधानसभा क्षेत्रात रंगत आहे.