हाय व्होल्टेज घडामोडी, उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर सुधीर साळवी काय म्हणाले?

| Updated on: Oct 25, 2024 | 9:57 PM

"मला माहिती आहे की, मला उमेदवारी न मिळाल्याने तुम्हालाही त्रास झालेला आहे. पण मी आज तुम्हाला सांगतो की, तुमच्या प्रत्येकाच्या मनातला आमदार हा सुधीर साळवी आहे. मला आज शिवसेना पक्षप्रमुखांनी बोलावून घेतलं होतं. मातोश्री येथे 20 मिनिटं चर्चा झाली", अशी प्रतिक्रिया सुधीर साळवी यांनी उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर दिली.

हाय व्होल्टेज घडामोडी, उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर सुधीर साळवी काय म्हणाले?
उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर सुधीर साळवी काय म्हणाले?
Follow us on

शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुधीर साळवे यांनी शिवडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती. पण या मतदारसंघात गेल्या 10 वर्षांपासून ठाकरे गटाचे विधानसभेचे गटनेता अजय चौधरी हे आमदार आहेत. पण सुधीर साळवी यांनी उमेदवारी मागितल्यामुळे शिवडी मतदारसंघाबाबत पेच निर्माण झाला होता. अखेर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुधीर साळवी यांना फोन करुन ‘मातोश्री’ निवासस्थानी बोलावलं. त्यानुसार साळवी ‘मातोश्री’ बंगल्यावर गेले. यावेळी साळवी आणि उद्धव ठाकरे यांच्यात जवळपास 20 मिनिटे चर्चा झाली. यावेळी सुधीर साळवी यांची मनधरणी करण्यात उद्धव ठाकरे यांना यश आलं. त्यामुळे अजय चौधरी यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील मिळाला. यानंतर अजय चौधरी हे लालबागला आले. तिथे त्यांनी ठाकरे गटाच्या शाखेबाहेर जमलेल्या शेकडो समर्थकांना संबोधित केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत काय चर्चा झाली, तसेच आपली पुढची भूमिका काय आहे? याबाबत खुलासा केला.

“मी शिवसेनेत अनेक वर्ष काम केलेलं आहे. मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या विचाराने काम केलं आहे. मी आयु्ष्यात कधी राजकारण केलं नाही हे तुम्हाला देखील माहिती आहे. मी यावेळी शिवसेनेची उमेदवारी मागितली होती त्यानंतर ज्या पद्धतीने प्रवास पुढे गेला, त्या प्रवासात तुम्ही सगळ्यांनी मला जी साथ दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांना दंडवत घालतो. ही साथ शिवडीकरांची लालबाग परळकरांची होती”, असं सुधीर साळवी म्हणाले.

“शिवसेनाप्रमुख, शिवसेना पक्षप्रमुखांचा बालेकिल्ला आणि यावरचा भगवा अबाधित ठेवण्यासाठी आपण कष्ट केले. खूप काही भोगलं आहे. या मुंबईचा विकासाच्या नावाने जो भकास होतोय, आपण मराठी माणसं एकजुटीने जे काम करतोय, इथलं आरोग्य आणि शिक्षणावर काम केलं. समाजकारणावर भर दिलं. अनेक लोकं आपल्यासोबत जोडली गेली. पक्षाच्या नात्याने अनेकांशी आपण काम केलं”, असं साळवी म्हणाले.

‘मला ज्यावेळेला उमेदवारी नाही मिळाली तेव्हा…’

“मला ज्यावेळेला उमेदवारी नाही मिळाली तेव्हा आपण सर्व नाराज झालात. तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की, मी तुमच्याशी बोलतो. अनेक लोकांना मी काय बोलतोय ते कळत नव्हतं. मला माहिती नव्हतं की, इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये भावना असेल की, एका सुधीर साळवीला, मध्यवर्गीय कुटुंबातील 260 स्केअर फूटमध्ये राहणाऱ्या, जनसंपर्काच्या माध्यमातून जो मुलगा तयार झाला त्याला आज उमेदवारी मिळावी या मागणीसाठी तुम्ही कालदेखील मोठ्या प्रमाणात आला होता. त्यामुळे मी आज तुमच्याशी संवाद साधतोय”, असं सुधीर साळवी यांनी संबोधित केलं.

‘तुमच्या प्रत्येकाच्या मनातला आमदार हा सुधीर साळवी’

“मला माहिती आहे की, मला उमेदवारी न मिळाल्याने तुम्हालाही त्रास झालेला आहे. पण मी आज तुम्हाला सांगतो की, तुमच्या प्रत्येकाच्या मनातला आमदार हा सुधीर साळवी आहे. मला आज शिवसेना पक्षप्रमुखांनी बोलावून घेतलं होतं. मातोश्री येथे 20 मिनिटं चर्चा झाली. पक्ष, संघटना काय असते हे बाळकडू मी घेतलेलं आहे. ते मी इतरांनाही सांगत असतो. मी ज्या भावनेने उमेदवारी मागितली होती, तरुणांची इच्छा होती की, सुधीर भाऊला उमेदवारी मिळायला हवी. माझी उमेदवारी आज नाकारली गेली असली तरी मी कालही पक्षासोबत प्रमाणिक होतो, आजही आहे आणि उद्याही प्रामाणिक राहणार आहे. पक्षासोबत राहणं आणि निष्ठा काय आहे ते मला माहिती आहे. मी नाराज होणारा कार्यकर्ता नाही. पण काल मी इथे आलो तर तुम्ही प्रचंड मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळे मला आज तुमच्याशी बोलायचं आहे”, अशी भूमिका सुधीर साळवी यांनी मांडली.

“माझं घर 24 तास समाजकारणासाठी उघडं राहील. लालबाग परळ हे सांस्कृतिक माहेरघर आहे. इथूनच अनेक कार्यकर्ते घडतात. मला पक्षप्रमुखांनी शब्द दिला आहे की, सुधीर तुला नाउमेद करणार नाही. मला उद्धव ठाकरे यांनी शब्द दिला आहे की, संघटना तुझी योग्य ती दखल घेईल. माझा पक्षप्रमुखांवर विश्वास आहे. त्यामुळी मी माझ्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना हात जोडून विनंती आहे, पक्षप्रमुखांनी दिलेला निर्णय हा शिरसावंद्य असतो. यापुढेदेखील मी पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करेन हे तुम्हाला वचन देतो”, असं सुधीर साळवी म्हणाले.