‘शेवटच्या काळात बाळासाहेबांची प्रकृती खूपच खालावली, मी त्यांचा हात हातात घेतला, वचन दिलं की…’, ठाकरे नेमकं काय म्हणाले?

| Updated on: May 16, 2024 | 9:12 PM

"बाळासाहेब ठाकरे यांच्या शेवटच्या काळात त्यांची प्रकृती खालावत चालली होती. मी मुलगा म्हणून त्यांना वचन दिलं की शिवसैनिक मुख्यमंत्री करून दाखवेल. बाळासाहेबांना आपण जे उभं केलं त्याचं काय होईल? असं वाटत असेल म्हणून मी त्यांना वचन दिलं", असं उद्धव ठाकरे मुलाखतीत म्हणाले.

शेवटच्या काळात बाळासाहेबांची प्रकृती खूपच खालावली, मी त्यांचा हात हातात घेतला, वचन दिलं की..., ठाकरे नेमकं काय म्हणाले?
उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचा प्रातिनिधिक फोटो
Follow us on

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी शिवसेना आणि भाजप यांच्यातील युतीबाबत अनेक गोष्टींवर मनमोकळेपणाने भाष्य केलं. विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीआधी भाजप आणि शिवसेनेने एकत्रितपणे महायुतीत निवडणूक लढवली होती. पण निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपची युती तुटली होती. शिवसेना अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही होते. पण भाजपला ते मान्य नव्हतं. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी आपली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत ‘मातोश्री’ बंगल्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाबाबत निश्चत झाल्याचा दावा केला होता. उद्धव ठाकरे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’च्या मुलाखतीत आपण मुख्यमंत्रीपदासाठी इतके आग्रही का होतो? याबाबत भाष्य केलं.

“बाळासाहेब ठाकरे यांच्या शेवटच्या काळात त्यांची प्रकृती खालावत चालली होती. मी मुलगा म्हणून त्यांना वचन दिलं की शिवसैनिक मुख्यमंत्री करून दाखवेल. बाळासाहेबांना आपण जे उभं केलं त्याचं काय होईल? असं वाटत असेल म्हणून मी त्यांना वचन दिलं. माझी जबाबदारी म्हणून मी स्वीकारलं. शिवसेना जशीच्या तशी पुढे नेईन सांगितलं”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘मी म्हणालो, असं करू नका, कृपा करून’

“बाळासाहेब ठाकरे यांना दिलेल्या वचनबद्दल मी अमित शाह यांना हे सर्व सांगितलं. तेव्हा ते म्हणाले, ज्यांच्या जागा जास्त येतील त्यांचा मुख्यमंत्री होईल. मी म्हणालो असं करू नका. कृपा करून. कारण आपल्यातच पाडापाडी होईल. आपण क्लिअरकट अंडरस्टँडिंग करू. अडीच वर्ष तुमची असतील. मला काही हरकत नाही. अडीच वर्ष तुम्ही शिवसेनेला दिली तर आपण पत्र तयार करू, त्या पत्रावर पक्षप्रमुख म्हणून माझी सही असेल. शिवसेना जो मुख्यमंत्री असेल त्याची सही असेल. आणि वर मसुद्यात शिवसेना मुख्यमंत्री या तारखेला पद सोडेल असं लिहू. ते पत्र तुम्ही होर्डिंग करून मंत्रालयाच्या दारावर लावा. जर अडीच वर्ष पहिली आम्हाला दिली तर…”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“आता हे ठरलं होतं. ते म्हणाले, ठिक आहे. आपण एक दुसऱ्याला सांभाळू. त्यानंतर आम्ही पीसीला गेलो. तेव्हा लोकसभेला एक दोन ते तीन महिने बाकी होते. विधानसभा चार पाच महिन्याने येणार होती. आताच मुख्यमंत्रीपद जाहीर करण्याची गरज नाही. त्यामुळे त्यांना पत्रकार परिषदेत सांगितलं की पदं आणि जबाबदाऱ्या समसमान वाटप होईल. आता मुख्यमंत्री हे या पदात येतं. मुख्यमंत्री हे जबाबदारीचं पद येतं. आता ज्याला समसमान याचा अर्थ कळतो त्याला तो कळला”, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.