Uddhav Thakeray : तुम्ही भाजपचे असाल तरीही बंदमध्ये सामील व्हा, कारण… उद्धव ठाकरे यांचं आवाहन काय?

| Updated on: Aug 23, 2024 | 12:52 PM

Maharashatra Bandh 24 August 2024 : शनिवारी, 24 ऑगस्ट 2024 रोजी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदविषयी उद्धव ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.

Uddhav Thakeray : तुम्ही भाजपचे असाल तरीही बंदमध्ये सामील व्हा, कारण... उद्धव ठाकरे यांचं आवाहन काय?
उद्धव ठाकरे यांचे भाजपला आवाहन काय
Follow us on

उद्या, 24 ऑगस्ट 2024 रोजी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदबाबत उद्धव ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. हा बंद राजकीय नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विकृतीच्या विरोधात आम्ही बंद पुकारत आहोत. आजपर्यंत जसा बंद झाला, तसाच बंद असेल. सर्व नागरिकांचा बंद असेल. जात पात धर्माचा भेद नसेल. याच्या कक्षा ओलांडून सर्वांनी बंदमध्ये यावं. हा सामाजिक प्रश्न आहे. आजपर्यंतच्या बंदसारखाच असेल. कडकडीत बंद असावा, असे आवाहन त्यांनी केले.

सुरक्षित बहीण ही आपली भूमिका

सर्वांना सांगतो उद्या दुपारी २ वाजेपर्यंत बंद कडकडीत पाळा. सरकारच्या कारभारावर चिंता व्यक्त करत आहोत हे सरकारला दाखवून द्या. काही पेपरमध्ये बातम्या आल्या आहेत. शाळेतील मुख्याध्यापिकेने प्रश्न केला की या जखमा सायकल चालवल्याने झाल्या असतील. कोर्टानेही काल बदलापूर प्रकरणावर ताशेरे ओढले आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा

रोज घटना घडत आहे. १३ ऑगस्टला बदलापूर,. १५ पुणे, २० ऑगस्ट लातूर, नाशिक, पुणे, मुंबई, कोल्हापूर आणि नागपूरमध्ये या घटना घडल्या आहेत. सरकारला आरसा दाखवत आहे. एवढं सर्व चालू असताना एवढं निर्ढावलेपणे बहिणीची किंमत पैशात करत असाल तर बहिणीच्या नात्याला कलंक लावू नका. बहिणीचं रक्षण करा. सुरक्षित बहीण फार महत्त्वाचं आहे. बातम्या वाचून संतापाचा कडेलोट होतोय, असे ते म्हणाले.

आता जागे व्हा

आंदोलकांना दरोडेखोरासारखं बांधून आणत आहेत. पळून जाऊ नये म्हणून दोरखंडात बांधलं जात आहे. पोलिसांनाच अटक केली पाहिजे. बंद नंतर या सर्व आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले पाहिजे. नाही तर रस्त्यावर उतरावं लागेल. राज्यातील जनतेला विनंती करतो घरापर्यंत विकृती येऊ नये म्हणून जागे व्हा. उंबरठ्यापर्यंत आलेलं संकट दूर करण्यासाठी आपण समोर या. याचं विराट दर्शन उद्या घडवा. लोकल आणि बसही बंद ठेवा. हा राजकीय बंद नाही. जनतेचा बंद आहे. सरकारला विनंती करत आहे. संताप असला तरी सरकारला विनंती करतो की तुम्हाला मुलीबाळी आहेत. त्यांच्या संरक्षणासाठी तुम्ही सक्षम नाही. पण जनता आहे. त्यामुळे उद्याच्या बंद आड पोलिसांची दादागिरी येऊ देऊ नका, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

भाजप कार्यकर्त्यांना केले आवाहन

आततायीपणे सरकारने वागू नये. हट्टाने बंदचा फज्जा उडवण्याचा प्रयत्न करू नका. उद्या जर फज्जा उडवला तर दोन तीन महिन्याने लोक तुम्हाला उडवतील. तुम्ही कोणत्याही जातीचे, भाषेचे पक्षाचे असाल, भाजपचे असाल तरीही हा बंद कुटुंबीयांसाठी आहे. त्यात सहभागी व्हा, असे आवाहन त्यांनी केले.