Mahayuti : विधानसभेसाठी भाजपचा वरचष्मा? अमित शाह यांचा फॉर्म्युला शिंदे-दादा गटाला मान्य? काय झाली रात्री खलबतं

| Updated on: Sep 26, 2024 | 9:25 AM

Mahayuti Seat Sharing : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात बैठकांचे सत्र घेतले. नागपूर, छत्रपती संभाजीनगर येथे त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मराठवाडा आणि विदर्भावर भाजपने लक्ष केंद्रीत केले आहे. यावेळी महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे.

Mahayuti : विधानसभेसाठी भाजपचा वरचष्मा? अमित शाह यांचा फॉर्म्युला शिंदे-दादा गटाला मान्य? काय झाली रात्री खलबतं
महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला काय?
Follow us on

महायुतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचा दावा सूत्र करत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नागपूरसह छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधला. भाजप विदर्भासह मराठवाड्यातील विधानसभेच्या जागा जिंकण्यासाठी भाजपने मायक्रो प्लॅनिंग केले आहे. लोकसभेतील विधानसभानिहाय कामगिरीची समीक्षा केल्यानंतर पक्ष सुक्ष्म नियोजनावर भर देत आहे. त्यातच आता जागा वाटपात पण भाजपचा वरचष्मा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे मित्र पक्षांच्या झोळीत ज्या जागा येतील त्यात अपक्षांसाठी मित्र पक्षांनाच मन मोठं करावं लागणार आहे. तर भाजपही त्याच्या कोट्यातील काही जागा छोट्या पक्षांसाठी सोडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याविषयीची अधिकृत आकडेवारी जाहीर झाल्यावर चित्र समोर येईल.

155 जागांवर भाजपचा दावा

छत्रपती संभाजीनगर येथे रात्री उशीरापर्यंत जागा वाटपासाठी खलबतं करण्यात आली. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते. या बैठकीत भाजपने 155-160 जागा लढवाव्यात आणि उर्वरीत जागा मित्रपक्षांनी लढवाव्यात अशी रणनीती आखल्याची माहिती समोर येत आहे. भाजप कोणत्याही परिस्थितीत 150 पेक्षा कमी जागांवर लढणार नसल्याचे पण बैठकीत स्पष्ट करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. भाजप जवळपास 155 जागा लढणार असल्याचे या बैठकीतील सूर होता. त्यामुळे जागा वाटपात भाजपचा वरचष्मा दिसला. त्यावर मित्रपक्षांची प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

हे सुद्धा वाचा

मित्रपक्षांच्या पारड्यात जागा किती?

भाजपने 155 जागावर दावा केल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाच्या वाट्याला 133 जागा येतील. भाजप जितक्या कमी जागा लढेल, तेवढा मित्रपक्षांचा फायदा असं एकंदरीत गणित आहे. सध्या शिंदे गट आणि दादा गटाचे मिळून एकूण 94 आमदार आहेत. यामध्ये इतर पक्षातील पाठिंबा दिलेले आमदार आणि अपक्षांची पण गोळाबेरीज आहे. आता 133 जागांमधून 94 जागा जाता 39 जागांवर मित्रपक्षांना जागा वाटपाचे सूत्र ठरवावे लागेल. शिंदे, फडणवीस आणि अजितदादा यांच्यात बैठक होऊन यावर तोडगा काढण्यात येईल. मित्र पक्षांपैकी दादा गट आणि शिंदे गट किती जागा लढणार हे ठरले नाही. निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. लोकसभेतील उणीवा दूर करून अधिकाधिक जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.