Maharashtra Rain Update | नागपुरात ढगफुटी, पुढचे 4 दिवस अतिमहत्त्वाचे, पावसाचा अंदाज काय?

| Updated on: Sep 23, 2023 | 8:15 PM

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस जोरदार बॅटिंग करत आहे. काही ठिकाणी तर पावसामुळे जनजीवनदेखील विस्कळीत झालंय. असं असताना हवामान विभागाकडून पावसाबद्दल अतिशय महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.

Maharashtra Rain Update | नागपुरात ढगफुटी, पुढचे 4 दिवस अतिमहत्त्वाचे, पावसाचा अंदाज काय?
फोटो सौजन्य - सोशल मीडिया
Follow us on

मुंबई | 23 सप्टेंबर 2023 : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या पाऊस पडतोय. मुंबईत आज सकाळपासून पाऊस सुरुय. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, बुलढाणा, कोल्हापूर, अहमदनगर, बीड, नागपूर, जालना, हिंगोली, परभणी जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये आज पावसाने हजेरी लावली. राज्यात गेल्या काही आठवड्यांपासून पावसाने दडी मारली होती. पण आता बंगालच्या उपासागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस पडतोय. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये तर ढगफुटी सदृश्य पाऊस पडलाय. विशेष म्हणजे पुढचे चार दिवस हा पाऊस कोसळणार आहे, अशी माहिती हवामान विभागाकडून मिळत आहे.

नागपुरात काल रात्री ढगफुटीसदृश्य पाऊस पडला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. नाग नदीला पूर आल्याने अनेक घरांमध्ये पाणी शिरलं. पुराचं पाणी आता ओसरायला सुरुवात झालीय. दरम्यान, पावसामुळे हाहाकार उडाल्यानंतर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपुरात जावून पूर परिस्थितीचा आढावा घेणार असल्याची माहिती मिळत आहे. असं असलं तरी पाऊस पुन्हा येणार आहे. विशेष म्हणजे विदर्भासाठी पुढचे चार दिवस अतिशय महत्त्वाचे असणार आहेत.

‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची दाट शक्यता

मिळालेल्या माहितीनुसार, हवामान विभागाने पुढच्या चार दिवसांसाठी संपूर्ण राज्याला येलो अलर्ट दिलाय. त्यामुळे संपूर्ण राज्यात 27 सप्टेंबरपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेषत: यवतमाळ,वाशिम, वर्धा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, अमरावती, अकोला, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, पुणे, सातारा, सोलापूर, नाशिक, जळगाव, रत्नागिरी, रायगड, ठाणे या जिल्ह्यांमध्ये पावसाची दाट शक्यता आहे. संपूर्ण राज्यासाठी पुढचे 48 तास महत्त्वाचे आहेत. तर या जिल्ह्यांसाठी पुढचे तीन दिवस महत्त्वाचे आहेत.

राज्यात सध्या होणारा पाऊस हा खरंतर मोसमी पाऊसच आहे. हा पाऊस परतीचा पाऊस नाही. राजस्थानात सुरुवातीली परतीचा पाऊस येईल. येत्या सोमवारपासून तिथे परतीचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा परतीचा पाऊस महाराष्ट्रात 5 ते 10 ऑक्टोबरला पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

बीडच्या आष्टी तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस

बीडच्या आष्टी तालुक्यातील बावी परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस पडलाय. आष्टी, डोईठानसह चार गावात मुसळधार पाऊस पडलाय. मुसळधार पावसामुळे बावी गावासह चार गावांना जोडणारा पुल वाहून गेलाय. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय. मुसळधार पावसाने पूर परिस्थिती निर्माण झालीय. पुराच्या पाण्यात शेतकऱ्याच्या 5 शेळ्या वाहून गेल्या आहेत. याशिवाय अनेक गुरे वाहून गेले आहेत. गुरे वाहून जातानाचे दृष्ये मोबाईल कॅमेरात कैद झाले आहेत.

नागपुरात 4 तास ढगफुटीसदृश्य पाऊस, 2 महिलांचा मृत्यू

नागपुरात मध्यरात्री 2 ते पहाटे 5 वाजेपर्यंत विजांच्या कडकडाटासह ढगफुटी सदृश्य पाऊस पडला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं. पावसानंतर उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाच्या सतर्कतेने एनडीआरएफ, एसडीआरएफ, लष्कर आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने दुपारपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर आली. विविध ठिकाणी बचावकार्याद्वारे 400 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. या घटनाक्रमात 2 महिलांचा दुर्देवी मृत्यू झाला. तर 14 जनावरे दगावली आहेत.