लोकसभेपूर्वी राज्यात काय घडणार?; रोहित पवार यांचा सर्वात मोठा दावा खरा ठरणार?

| Updated on: Nov 13, 2023 | 1:23 PM

लोकशाहीच्या बाजूने निर्णय घेतला तर शिंदे गट अडचणीत येईल. संविधानाच्या बाजूनेच निर्णय व्हावा एवढं जनतेला अपेक्षित आहे. विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेताना बराच उशीर केला आहे. विधानसभा अध्यक्ष माझे मित्र आहेत. ते आदरणीय आहेत, आदरणीय पदावर आहेत. महाराष्ट्र दिल्ली समोर जुखला नाही. याचं भान ठेवावं एवढीच विनंती आहे. तुम्ही सारखं दिल्लीत जाऊन मार्गदर्शन घेत असाल तर लोकांना आवडणार नाही, असं रोहित पवार म्हणाले.

लोकसभेपूर्वी राज्यात काय घडणार?; रोहित पवार यांचा सर्वात मोठा दावा खरा ठरणार?
rohit pawar
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

स्वप्नील उमप, विवेक गावंडे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, अमरावती | 13 नोव्हेंबर 2023 : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एक मोठा दावा केला आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे गटाचा वापर फक्त निवडणुकीपुरताच केला जाईल. त्यांचं महत्त्व संपलं की त्यांना सोडून दिलं जाईल. लोकसभा निवडणूकपूर्वी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या सोबत असलेला एक एक गट भाजपमध्ये प्रवेश करेल, असा मोठा दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. अजितदादा आणि शिंदे गटातील कोणते नेते भाजपमध्ये प्रवेश करणार याचा कयासही वर्तवला जात आहे. काही गोष्टी ठरल्या होत्या. त्या झाल्या नसतील म्हणून अजित पवार हे अमित शाह यांना भेटले असावेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

रोहित पवार अमरावतीत आले आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांना भाजप हे असत्याचा मार्गाने जात असतं. भाजप कार्यकर्त्याला प्रत्येक कमेंटला तीन रुपये तर लाईकला 10 पैसे दिले जातात. त्याची एक टीम खोटी माहिती पसरवत आहे. भाजप खोट्या गोष्टी करत असते. जो दाखला दाखवला जात आहे, त्यात काहीच सत्यता नाही. शाळा सोडल्याचा दाखला व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी रोहित पवार यांनी केली.

फडणवीस रणनीती मागे

लोकसभेच्या आधी हिंदू मुस्लिम होत नाही म्हणून ओबीसी मराठा समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुद्धा भाजपाकडून केला जात आहे. अशा गोष्टींमुळे सामान्य लोकांचे मुख्य मुद्दे बाजूला राहतात. लक्ष दुसरीकडेच घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जातो. देवेंद्र फडणवीस सर्व रणनीतीच्या मागे आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केलाय. मराठा आणि ओबीसी सोबतच हिंदू-मुस्लिम असा वाद घडवून आणण्याचा प्रयत्न केला जाईल. समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुद्धा भाजपकडून केला जाईल, असा दावाही त्यांनी केलाय.

भाजपला लोक नेता नकोय

अजित पवार आणि शरद पवार परत येतील की नाही तो त्यांचा दोघांचा प्रश्न आहे. मात्र अजितदादांच्या चेहऱ्याकडे पाहून ते नाराज आहेत असं जाणवतं. भाजपला लोकनेता पटत नाही. त्यांना त्यांच्या पक्षातला लोकनेता सुद्धा पटत नाही. भाजप लोकनेत्यांची ताकद कमी करत असते. तीच गोष्ट अजितदादा सोबत होत आहे. गोपीनाथ मुंडे, पंकजा मुंडे, पांडुरंग फुंडकर, विनोद तावडे, एकनाथ खडसे यांची ताकद भाजपने कमी केली आहे, असही ते म्हणाले.