‘आपलं लक्ष पवार-ठाकरेंना रोखणं’, नागपुरात बंद दाराआड बैठक, अमित शाह यांचे महत्त्वाचे आदेश

| Updated on: Sep 24, 2024 | 9:38 PM

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आज नागपुरात बैठक पार पडली. या बैठकीत अमित शाह यांनी भाजपचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. या बैठकीत अमित शाह यांनी नेमक्या काय सूचना दिल्या? याबाबतची महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

आपलं लक्ष पवार-ठाकरेंना रोखणं, नागपुरात बंद दाराआड बैठक, अमित शाह यांचे महत्त्वाचे आदेश
अमित शाह, देवेंद्र फडणवीस
Image Credit source: ANI
Follow us on

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली नागपूरमध्ये भाजपची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अमित शाह यांनी मोठं वक्तव्य केलं. भाजप विदर्भात जिंकला म्हणजे महाराष्ट्र जिंकला, असं वक्तव्य अमित शाह यांनी केलं आहे. दरम्यान, मैदान तयार झालं आहे. नेत्यांनी हिंमतीने मैदानात उतरा, अशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज नागपूर दौऱ्यावर होते. त्यांनी विदर्भातील सगळ्याच विधानसभाचा जागांचा आढावा घेतला. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह विदर्भातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी आजी-माजी आमदार उपस्थित होते. जवळपास 1500 पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. यावेळी अमित शाह यांनी पदाधिकाऱ्यांना काही कानपिचक्या दिल्या.

पुढचं नियोजन कसं करायचं? विरोधकांना कशाप्रकारे उत्तर द्यायची? विरोधकांना आपलसं करण्यात कसे यश मिळवायचं? त्याचप्रमाणे निवडणुकीला सामोरे जात असताना आणि विदर्भामध्ये लोकसभेत कमी झालेले मताधिक्य भरून काढण्याच्या दृष्टिकोनातून कशाप्रकारे प्रयत्न करायचे, याविषयी सुद्धा अमित शाह यांनी आपल्या नेते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. महत्त्वाचं म्हणजे बंदद्वार असलेल्या या बैठकीत अमित शाहा यांनी अनेक मुद्द्यांना हात घालत कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीत कुठल्याही परिस्थितीत आपल्याला जिंकायची आहे, असा जणू कानमंत्रच दिला.

अमित शाह यांनी नेमक्या सूचना काय दिल्या?

  • आपलं लक्ष शरद पवार, उद्धव ठाकरे यांना रोखण्याचं आहे
  • विदर्भात भाजपने जास्त जागा जिंकल्यात म्हणजे भाजप महाराष्ट्र जिंकला.
  • विदर्भातील 62 पैकी 45 हून अधिक जागा विदर्भात भाजपने जिंकायला हव्या आहेत.
  • निवडणुकीचं योग्य प्लॅनिंग करा. घड्याळ, बाणाला घेऊन आपण काम करा.
  • विदर्भात मिशन 45 राबवा. त्यापेक्षा जास्त जागा जिंकायच्या आहेत.
  • गटबाजी खपवून घेतली जाणार नाही.
  • बूथवर मोटर सायकल रॅली काढा.
  • 10 – 10 चे गट करून घरोघरी पोहचा. प्रत्येक बूथवर मतदान टक्केवारी वाढवा.
  • नाराज कार्यकर्त्यांना जवळ करा. त्यांच्याशी संवाद साधा.
  • बूथ प्रमुखांच्या भरवश्यावर बूथ सोडू नका. स्वत: लक्ष घाला.
  • सगळ्या नेत्यांनी जबाबदारी घ्यावी, कार्यकर्त्यांवर ढकलू नये.
  • नेत्यांनी नेते म्हणून राहू नका, कार्यकर्त्यांसोबत काम करा.
  • विरोधकांचे गावागावातील बूथ आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करा.
  • संत महंत यांना भेटा. त्यांना एकत्रित करा.
  • बाहेरच्या कार्यकर्त्यांना आपलं करून त्यांना सोबत घ्या.
  • भाजपमध्ये निवडणूक जिंकण्याचा पाया ऊर्जावान बूथ कार्यकर्ते आणि संघटना आहे
  • निवडणुका जवळ आल्या की इतर राजकीय पक्ष सभा आणि रोड-शो करण्यास सुरुवात करतात, पण भाजप आपल्या कार्यकर्त्यांसोबत बैठक आयोजित करते.
  • विदर्भात भाजपची मजबूत स्थिती आहे, महाराष्ट्रात भाजप सरकार स्थापन करेल.
  • भाजपचे कार्यकर्ते वैयक्तिक स्वार्थासाठी नाही, तर सांस्कृतिक राष्ट्रवाद प्रस्थापित व्हावा, याशिवाय भारताला सामर्थ्यवान, सुरक्षित आणि समृद्ध बनवण्यासाठी काम करतात.
  • राहुल गांधी अमेरिकेत बोलून आले की विकास झाल्यावर आरक्षण संपवलं जाईल. पण भाजप असं होऊ देणार नाही.
  • आपल्या विभागातील सर्व सहकारी संस्थांना भेट द्या आणि शेतकऱ्यांना मोदी सरकारच्या शेतकरी हिता संबंधित सर्व योजनांची माहिती द्या.

देवेंद्र फडणवीसांनी काय सूचना केल्या?

  • आपल्यातील काही जणांनी आधी नकारात्मकता दूर करा, मैदान तयार झालं आहे.
  • हिंमतीने मैदानात उतरा, नेत्यांनी मैदानात उतरुन काम केलं पाहिजे.
  • अडीच वर्षात अनेकांच्या आकांक्षा पूर्ण झाल्या नसतील. मात्र, आता परिवर्तनाची गरज आहे.
  • आपल्याला मजबूत सरकार आणायचं आहे. विदर्भातील कुणीही प्रश्नचिन्हं निर्माण करणार नाही, असं काम करा.