‘शिंदे अ‍ॅक्सिडेंटल मुख्यमंत्री, फडणवीसच CM हवेत’ म्हणणाऱ्या भाजपच्या माजी आमदाराचं थेट 6 वर्षांसाठी निलंबन

| Updated on: Oct 15, 2024 | 8:03 PM

भाजपकडून माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. मल्लिकार्जुन रेड्डी यांनी विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, अशी मागणी केली होती. तसेच त्यांनी शिंदे गटाच्या उमेदवारास सहकार्य करण्यास नकार दिला होता. त्यामुळे पक्षाने त्यांच्यावर थेट 6 वर्षे निलंबनाची कारवाई केली आहे.

शिंदे अ‍ॅक्सिडेंटल मुख्यमंत्री, फडणवीसच CM हवेत म्हणणाऱ्या भाजपच्या माजी आमदाराचं थेट 6 वर्षांसाठी निलंबन
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस
Follow us on

भाजपचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांच्यावर पक्षाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. मल्लिकार्जुन रेड्डी यांच्यावर तब्बल 6 वर्षांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. शिवसेनेचे एकनाथ शिंदे नव्हेत तर भाजपचे देवेंद्र फडणवीस हे आगामी काळात निवडणुकीनंतर मुख्यमंत्री हवेत, असं वक्तव्य मल्लिकार्जुन रेड्डी यांनी केलं होतं. मल्लिकार्जुन रेड्डी यांच्याकडून आशिष जयस्वाल यांच्या उमेदवारीलादेखील विरोध करण्यात आला होता. त्यामुळे त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

भाजपकडून मल्लिकार्जुन रेड्डी यांना अधिकृत पत्र पाठवण्यात आलं आहे. “आपण भारतीय जनता पार्टीचे जबाबदार पदाधिकारी असताना पक्ष विरोधी कारवाया करत पक्षशिस्त आणि अनुशासन भंग करणारे कृत्य केलं आहे. आपली ही कृती पार्टीचा अनुशासन भंग करणारी असून आपल्याला 6 वर्षांकरता पक्षातून निलंबित करण्यात येत आहे”, असं पत्र मल्लिकार्जुन रेड्डी यांना पाठवण्यात आलं आहे. भाजपचे कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांच्याकडून मल्लिकार्जुन रेड्डी यांना निलंबनाचं पत्र पाठवण्यात आलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामटेकचे विद्यमान अपक्ष आमदार आशिष जयस्वाल यांना शिवसेना पक्षाकडून उमेदवारी जाहीर केली आहे. पण त्यांच्या उमेदवारीला रामटेकचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी विरोध केला होता. “एकनाथ शिंदे हे अ‍ॅक्सिडेंटल मुख्यमंत्री आहेत. त्यांना आता आम्हाला मुख्यमंत्री करायचं नाही. भाजपचा मुख्यमंत्री हवा. मला फाशी दिली तरी चालेल पण आशिष जयस्वाल यांचं रामटेक मतदारसंघात काम करणार नाही. आमच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. मी महायुतीचा सन्मान करतो. मात्र आशिष जयस्वाल यांना विरोध आहे. नागपूर जिल्ह्यातून शिंदे गटाचा आमदार येऊ नये, अशी आमची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मागणी आहे”, अशी भूमिका मल्लिकार्जून रेड्डी यांनी मांडली होती.

हे सुद्धा वाचा

“महायुतीचे धर्मपालन कसे करणार? आशिष जयस्वाल यांनी आमच्या कार्यकर्त्यांना मदत केली नाही. कार्यकर्त्यांना मानसन्मान नाही. निधी देत नाहीत. ते अपक्ष बंडखोर आमदार होते. विदर्भात न्याय मिळाला पाहिजे. 45 जागा निवडून आणण्याचा संकल्प केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे. आम्ही आशिष जयस्वाल यांचे काम करणार नाही फाशी दिली तरी चालेल. उमेदवार बदलला पाहिजे, हे पक्षाचे वफादार नाहीत. भाजपने पुन्हा विचार करावा. माझ्याकडे काय आहे, काहीच नाही, आमच्यावर काय कारवाई करणार”, असं मल्लिकार्जुन रेड्डी म्हणाले होते.