महाराष्ट्राच्या राजकारणात अंडरवर्ल्ड डॉनसोबतच्या व्यवहारावरुन संग्राम, उद्धव ठाकरे काय-काय म्हणाले?

| Updated on: Dec 11, 2023 | 3:31 PM

उद्धव ठाकरे यांनी आज नागपुरात दाखल होताच देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. दोन्ही उपमुख्यमंत्री सभागृहात आजूबाजूला बसले आहेत. असं असताना ते नवाब मलिकांच्या मुद्द्यावरुन एकमेकांना पत्र पाठवत आहेत. नवाब मलिक यांना दूर ठेवण्याचा निर्णय घेतला तर मग प्रफुल्ल पटेल यांच्यासोबतही तसाच न्याय व्हायला हवा, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्राच्या राजकारणात अंडरवर्ल्ड डॉनसोबतच्या व्यवहारावरुन संग्राम, उद्धव ठाकरे काय-काय म्हणाले?
Follow us on

नागपूर | 11 डिसेंबर 2023 : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने आज नागपुरात दाखल झाले आहेत. त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठवलेल्या पत्रावरुन निशाणा साधला आहे. “सध्या पत्रांचा जमाना आहे. आम्ही दोन पत्र दिलेली आहेत. एक निवडणूक आयोगाला पत्र दिलं आहे. धर्माच्या आणि देवाच्या नावावर मतं मागायची असतील तर आम्हीसुद्धा सुरु करतो”, असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी अंडरवर्ल्ड डॉन इकबाल मिर्चीचा देखील उल्लेख केला. खरंतर भाजप नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर लंडनमध्ये जावून मिर्चीची भेट घेतल्याचा आरोप केलाय. त्यानंतर आता ठाकरेंनी नवाब मलिक आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत एक न्याय हवा, अशी मागणी करत असताना इकबाल मिर्चीचा उल्लेख केला आहे.

“आम्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आहे. कारण त्यांनी एक पत्र त्यांच्या बाजूला दिलं होतं. आता मी सभागृहात जावून आलो. एका उपमुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना पत्र दिलंय. बसण्यात काही अंतर आहे का? तसं नाही. आजूबाजूला बसत आहेत. आजूबाजूला बसत असताना त्यांना पत्र लिहावं लागत आहे. तर ते राजमान्य राजश्री पत्र लिहिण्यास कारण की… त्या पत्राचं उत्तर कधी मिळणार? त्याची वाट बघतोय”, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

‘नवाब मलिकांना दूर ठेवणार, मग…’

“ते पत्र नवाब मलिक यांच्याबद्दलचं आहे. त्यांच्या देशाबद्दल एवढ्या भावना तीव्र असतील तर त्याचा आदर करतो. भारतीय जनता पक्षाच्या भावना देशप्रेमाबद्दल एवढ्या उचंबळून आल्या असतील तर त्या पत्राचं उत्तर सुद्धा कधी मिळणार? हे सु्द्धा आम्हाला माहिती नाही. त्यांनी ज्याप्रकारे सांगितलं की, नवाब मलिकांना दूर ठेवा. मग तोच न्याय दुसऱ्याला लावणार आहात की नाही? कारण एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दोन न्याय हे लोकांना पटेल का? हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘मिर्चीसोबत व्यापार केला त्याच्याबरोबर सत्तेचा व्यापार चालू देणार का?’

“थोडक्यात सांगायचं झालं तर नवाब मलिकांना एक न्याय लावणार असाल तर तोच न्याय प्रफुल्ल पटेल यांना लावून त्यांच्यापासून अंतर ठेवणार आहात की नाही? जी मालमत्ता इकबाल मिर्चीची म्हणून त्याच्याबरोबर व्यवहार केला म्हणून स्वत: पंतप्रधान नेरेंद्र मोदी म्हणाले होते, मला आठवतंय, कारण तेव्हा आमची युती होती. ते वांद्रे-कुर्ला येथील सभेत म्हणाले होते की, काही लोक मिर्चीचा व्यापार करतात, काही लोक मिर्चीसोबत व्यापार करतात”, असं उद्धव ठाकरे म्हणाले

“आता ज्याने अंडरवर्ल्ड डॉन इकबाल मिर्चीसोबत व्यापार केला आहे त्याच्याबरोबर हा सत्तेचा व्यापार तुम्ही चालू देणार आहात का? की त्यांच्यावर ईडीने जी मालमत्ता जप्त केल्याची कारवाई केली आहे ती पुढे चालू ठेवणार आहात की नाही? या प्रश्नांच्या उत्तराची आम्ही वाट पाहतोय”, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली.