हालचाली वाढल्या; नाना पटोले, बाळासाहेब थोरात शरद पवारांच्या भेटीला, संजय राऊतही येणार

| Updated on: Oct 23, 2024 | 5:53 PM

शरद पवार यांच्याकडून नाना पटोले आणि संजय राऊत यांच्या वादात मध्यस्थी करण्यात येत आहे. यासाठी वाय. बी. चव्हाण सेंटर येथे महत्त्वाची बैठक पार पडत आहे. या बैठकीनंतर आज संध्याकाळी महाविकास आघाडीची पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे.

हालचाली वाढल्या; नाना पटोले, बाळासाहेब थोरात शरद पवारांच्या भेटीला, संजय राऊतही येणार
नाना पटोले, बाळासाहेब थोरात शरद पवारांच्या भेटीला, संजय राऊतही येणार
Follow us on

महायुतीच्या तीनही पक्षांकडून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. विशेष म्हणजे महायुतीचे अनेक दिग्गज नेते उद्या त्यांचा उमेदवारी अर्ज भरणार असल्याची देखील माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या आपला उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती आहे. असं असताना महाविकास आघाडीच्या एकाही पक्षाकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली नाही. निवडणुकीसाठी अर्ज करण्याची तारीख सुरु झाली आहे. उमेदवारी अर्ज करण्यासाठीचा आज दुसरा दिवस आहे. पण महाविकास आघाडीत जागावाटपावरुन वाद निर्माण झाल्याने उमेदवारांची घोषणा करण्यास विलंब झाला. पण ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मध्यस्थी केल्याने आता मविआतील वाद मिटणार आहे.

महाविकास आघाडीतील वाद आता पूर्णपणे संपुष्टात येणार आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि शरद पवार यांनी काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची त्यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी जावून भेट घेतली होती. यानंतर शरद पवार पवार आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यातील वाद मिटवणार आहेत. शरद पवार यांच्या मध्यस्थी या दोन्ही नेत्यांमधील वितुष्ट आता दूर होणार आहे. याचसाठी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले शरद पवार यांच्या भेटीसाठी वाय. बी. चव्हाण सेंटर येथे दाखल झाले आहेत. त्यांच्यासह संजय राऊत हे देखील शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचणार असल्याची माहिती आहे. यावेळी चारही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे. या चर्चेतून वादावर तोडगा काढण्यात येणार आहे.

बाळासाहेब थोरात काय म्हणाले?

बाळासाहेब थोरात नाना पटोले यांच्यासोबत वाय. बी. चव्हाण सेंटर येथे पोहोचले तेव्हा थोरातांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. “वाद सर्व मिटले आहेत. चर्चा असतेच आणि निवडणूक असल्यावर चर्चा करावीच लागते. महाविकास आघाडीच्या बैठका होत राहतील”, अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली.

विजय वडेट्टीवार काय म्हणाले?

दरम्यान, विजय वडेट्टीवार यांनी याबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. “आमचा तिढा सुटला आहे. आम्ही 5 जागा हायकमांडवर सोडल्या आहेत. आम्ही जागावाटपाचे गणित आज सांगून टाकू. काही जागांवर चर्चा करण्यासाठी आम्ही आलो आहोत. आम्ही या सरकारला हाकलण्यासाठी सज्ज झालो आहोत. आम्ही यांची स्वप्न भंग करणार आहोत. दोन वेळा संजय राऊत आणि नाना एकत्र आले आहेत. आमच्यात उत्तम चर्चा आहे. ती सुरु आहे. आज चर्चा संपेल आणि जागावाटप जाहीर करु”, अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली.