अजित दादा आणि एकनाथ शिंदे यांना टेन्शन देणारं विधान, नारायण राणेंच्या मनात काय?

| Updated on: Jul 26, 2024 | 6:54 PM

राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजणार आहे. पण या निवडणुकीच्या आधीच भाजप नेते नारायण राणे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. नारायण राणे यांचं हे वक्तव्य महायुतीमधील घटक पक्षाचे प्रमुख नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चिंता वाढवणारं आहे.

अजित दादा आणि एकनाथ शिंदे यांना टेन्शन देणारं विधान, नारायण राणेंच्या मनात काय?
नारायण राणेंचं अजित दादा आणि एकनाथ शिंदे यांना टेन्शन देणारं विधान
Follow us on

देशभरात काही दिवसांपूर्वी लोकसभेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला मोठा फटका बसला. या पराभवानंतर राज्यात पुढच्या तीन महिन्यांनी विधानसभेची निवडणूक होणार आहे. या विधानसभेत किती जागांवर निवडणूक लढवावी, याबाबत महायुतीच्या तीनही पक्षांच्या नेत्यांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. असं असताना भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांचं हे वक्तव्य महायुतीमधील बरोबरीचे साथीदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं चिंता वाढवणारं आहे. भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीत सर्व 288 जागांवर निवडणूक लढवावी, असं वक्तव्य नारायण राणे यांनी केलं. “मला वाटतं की, भाजपने 288 जागा लढावाव्यात. पण मी माझं मत व्यक्त केलं आहे”, असं नारायण राणे म्हणाले.

“लोकसभेच्या निवडणुकीनंतर देशात नवीन सरकार स्थापन झालं. भारताला जगात सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था बनवण्यासाठी 2024-25 या आर्थिक वर्षासाठीचं अर्थसंकल्प मांडण्यात आलं. या अर्थसंकल्पावर विरोधकांनी काही टीका केली. पण त्यांची ती टीका अर्थसंकल्प भाषेतील नाही. त्यांनी अर्थसंकल्प म्हणजे काय? याचा अभ्यास केला तर बरं होईल”, असा टोला नारायण राणे यांनी विरोधकांना लगावला.

‘राज ठाकरेंच्या जागा वाढतील किंवा कमी होतील’

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी विधानसभेसाठी स्वबळाचा नारा दिला आहे. तसेच आपण 200 जागा लढवू, अशी घोषणा त्यांनी केली आहे. यावर नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली. “राज ठाकरे निवडणूक लढत आहे. ते बोलच आहेत की, 200 पेक्षा जास्त जागा असतील. ते त्यांचे हे जागांचे आकडे निवडणूक जाहीर होण्यापर्यंत सांगतील. पण नंतर सर्व बदल होईल. जागांचे आकडे वाढतील किंवा कमी होतील, नाहीतर अॅडजस्टमेंट होईल, बराच काही बदल होऊ शकतो”, असं नारायण राणे म्हणाले.

नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

नारायण राणे यांना यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. “उद्धव ठाकरे यांना उत्तर दिलं पाहिजे. मोदींनी महाराष्ट्राची लूट केली, दिल्लीचे बुट चाटणारे सरकार असं ठाकरे बोलले. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या बजेटमध्ये काय दिवे लावले याची माहिती माझ्याकडे आहे. 4.5 लाख कोटींचा बजेट आहे. ठाकरेंना बजेट कळतच नाही. 2020-21 ला 71 हजार कोटींची वित्तीय तुट आहे. उद्धव ठाकरेंनी बजेटवर बोलू नये. आमचा अर्थसंकल्प सर्वकष आहे”, असं नारायण राणे म्हणाले.

“देशाच्या बजेटमध्ये महाराष्ट्र नाही म्हणतात. उद्या महाराष्ट्राच्या बजेटमध्ये कलानगर दिसत नाही म्हणतील. केंद्राच्या बजेटमध्ये महाराष्ट्राला मिळालेल्या योजना किती? भारताला 10 वरून 5 व्या क्रमांकावर अर्थव्यवस्थेत आणलं”, असं राणे म्हणाले. “उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या इच्छा पूर्ण होवोत. तुम्हाला देव चांगलं बोलण्याची बुद्धी देवो. भावीला काही अर्थ नाही, भावीच राहतो. उद्धव ठाकरेच्या पक्षाला गळती लागली आहे”, असा खोचक टोला नारायण राणे यांनी लगावला.