नाशिकमध्ये दोन गटात वाद, भद्रकाली परिसरात तणावाचं वातावरण, नेमकं काय घडलं?

| Updated on: Aug 16, 2024 | 3:24 PM

बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात आज नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाकडून नाशिक बंदची हाक देण्यात आली होती. सकल हिंदू समाजाकडून बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या अत्याच्या विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी दोन गटात वाद झाल्याची माहिती समोर आली. पण पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आलं आहे.

नाशिकमध्ये दोन गटात वाद, भद्रकाली परिसरात तणावाचं वातावरण, नेमकं काय घडलं?
Follow us on

नाशिकच्या भद्रकाली परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात आज नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाकडून नाशिक बंदची हाक देण्यात आली होती. सकल हिंदू समाजाकडून बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या अत्याच्या विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला. सकल हिंदू समाजाच्या आवाहनाला अनेक व्यापाऱ्यांनी आणि दुकानदारांनी सकारात्मक प्रतिसाद देत दुकानं बंद ठेवली होती. पण नाशिकच्या भद्रकाली परिसरात काही दुकानं सुरु होती. सकल हिंदू समाजाची रॅली आज दुपारी भद्रकाली परिसरात पोहोचली. यावेळी आंदोलकांनी दुकानदारांना दुकान बंद करण्याचं आवाहन केलं. पण काही दुकानदारांनी त्यास विरोध केला. त्यामुळे नाशिकच्या भद्रकाली परिसरात दोन गटात वाद निर्माण झाला. भद्रकाली परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे यशस्वी प्रयत्न केले.

सकल हिंदू समाजाकडून आज नाशिक बंदची हाक देण्यात आली आहे. सकल हिंदू समाजाच्या या आवाहनाला चांगला प्रतिसाददेखील मिळाला. यानंतर सकल हिंदू समाजाकडून मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला उत्सफुर्त असा प्रतिसाद मिळाला. शेकडो तरुण या मोर्चात सहभागी झाले. आंदोलकांकडून जय श्रीरामाच्या घोषणा करण्यात आल्या. तसेच छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणाबाजी करण्यात येत होती. या दरम्यान हा मोर्चा नाशिकच्या भद्रकाली परिसरात पोहोचला तेव्हा शांततेत असलेल्या मोर्चाला वेगळं रुप मिळालं.

पोलीस आणि आंदोलकांमध्ये चर्चा

या मोर्चाकडे पोलिसांचं लक्ष होतं. तसेच पोलिसांनी अनेक आंदोलकांना मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नोटीस बजावण्यात आली होती. शहरात कोणतीही तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून सर्वोतोपरी काळजी घेतली जात होती. पण नाशिकच्या भद्रकाली परिसरात सकल हिंदू समाजाचा मोर्चा पोहोचला तेव्हा दुकानं बंद करण्यावरुन दोन गटात वाद झाला. यावेळी परिस्थिती निवाळण्यासाठी पोलिसांनी गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मोर्चा पुन्हा पुढच्या दिशेला निघाली. यावेळी पोलिसांनी या मोर्चाला एकाच ठिकाणी स्थानबद्ध केलं. मोर्चा आता इथेच थांबवण्यात यावा, अशी विनंती पोलिसांनी आंदोलकांनी केली. पण सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते मोर्चा पूर्ण करण्यावर ठाम आहेत. सध्या पोलीस आणि आंदोलकांमध्ये बातचित सुरु आहे.

‘त्यांची पाठ सोलून काढा’, आशिष शेलार यांचं आवाहन

नाशिकच्या घटनेवर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली. “कायदा कुणीही हातात घेऊ नये. दगडफेक करण्याचा प्रयत्न झाला असेल, तशी सुरुवात झाली असेल तर त्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. सकल हिंदू समाज इथे मोर्चा नाही काढणार तर कुठे काढणार? सकल हिंदू समाज भावना व्यक्त करत असेल तर त्याचं स्वागत आहे. या मोर्चामुळे ज्यांचं पोट दुखत असेल त्यांची पाठ सोलून काढा असं आमचं पोलिसांना आवाहन आहे”, असं आशिष शेलार म्हणाले.