पराभवानंतर नवनीत राणा पहिल्यांदाच भडाभडा बोलल्या, प्रत्येक प्रश्नाला सडेतोड उत्तर

| Updated on: Jun 13, 2024 | 10:13 PM

अमरावती लोकसभा निवडणुकीत प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी आपल्या पक्षाचा उमेदवार उभा केला होता. त्याचा फायदा काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांना झाला. बच्चू कडू यांच्याबाबत नवनीत राणा यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी एका वाक्यात उत्तर दिलं.

पराभवानंतर नवनीत राणा पहिल्यांदाच भडाभडा बोलल्या, प्रत्येक प्रश्नाला सडेतोड उत्तर
नवनीत राणा आणि रवी राणा
Follow us on

माजी खासदार नवनीत राणा यांनी आज अखेर माध्यमांसमोर येत सध्याच्या विविध राजकीय घडामोडींवर प्रतिक्रीया दिली. नवनीत राणा या अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपच्या तिकीटावर उभ्या होत्या. पण तिथे त्यांचा पराभव झाला. त्यांनी आपल्या पराभवावरही प्रतिक्रिया दिली. “मी माझ्या क्षेत्रासाठी ज्या पद्धतीने काम केले त्यानंतर मला कळले नाही की यंदा जनतेने मला का थांबवले?”, असं नवनीत राणा म्हणाल्या. यावेळी नवनीत राणा यांना विधानसभा निवडणुकीत आमदारकीसाठी उभं राहणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “राज्यात काम करायचे की कुठे हे ठरविले नाही”, अशी प्रतिक्रिया दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमासाठी आपण दिल्लीला गेला होता का? असा प्रश्न पत्रकारांनी नवनीत राणा यांना विचारलं. त्यावर त्यांनी “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शपथ होती. मी भाजपची कार्यकर्ता आहे. त्यामुळे दिल्लीत जाणे काहीही गैर नाही. यापूर्वीही पाच वर्ष दिल्लीत होती. पराभूत होऊनही आम्ही जिंकलो आहोत. कारण आमचे मोदी पंतप्रधान झाले आहेत”, अशी भूमिका मांडली. “मोदी एकटे लढले, त्यांना पराभूत करण्यासाठी अनेक लोकं झुंड बनवून त्यांना रोखत होते”, असं नवनीत राणा म्हणाल्या.

नवनीत राणा यांचा बच्चू कडू यांना टोला

अमरावती लोकसभा निवडणुकीत प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी आपल्या पक्षाचा उमेदवार उभा केला होता. त्याचा फायदा काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांना झाला. बच्चू कडू यांच्याबाबत नवनीत राणा यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी एका वाक्यात उत्तर दिलं. “काही लोकं मैदान जिंकण्यासाठी येतात, तर काही लोकं दुसऱ्यांना पराभूत करण्यासाठी येतात”, असं नवनीत राणा म्हणाल्या. “अमरावती आमच्या नेत्यांना माहित आहे की काय घडले. आम्ही कार्यकर्त्यांना त्यांना सांगायची गरज नाही”, असंदेखील नवनीत राणा म्हणाल्या.

‘तर मी एससी आणि एसटीचे समाजासोबात उभी राहीन’

“एससी आणि एसटीचे आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला आरक्षण दिले जाणार असेल, तर मी एससी आणि एसटीचे समाजासोबात उभी राहीन”, असं नवनीत राणा म्हणाल्या. “एससी आणि एसटी समाजातील लोकांना उद्देशून खोट्या स्वरूपात संविधान बदलले जाईल असा प्रचार केला. लवकरच एससी आणि एसटी समाजाला या खोट्या प्रचाराची जाणीव होईल”, असा दावा नवनीत राणा यांनी केला.

नवनीत राणा यांची ठाकरेंवर टीका

नवनीत राणा यांनी यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली. “उद्धव ठाकरे यांचा पोपट बोलत होता की आम्ही शपथ घेऊ आणि मोदींना निमंत्रित करू. पण सर्वांनी पाहिले मोदींनी शपथ घेतली. शेर आखिर शेर ही होता है. उद्धव ठाकरे यांनी सुद्धा मी पराभूत झाली म्हणून आता तरी हनुमान चालीसा पठण केलं पाहिजे”, अशी टीका नवनीत राणा यांनी केली.