मुख्यमंत्रीपदावरून अजितदादा गटाने महायुतीचा ताप वाढवला, प्रफुल्ल पटेल यांच्या थेट विधानाने खळबळ; काय बोलले नेमकं?

| Updated on: Jun 29, 2024 | 11:57 AM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात विधानसभा निवडणूका लढणार असं भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते घसाफोड करून सांगत असले तरी अजित पवार गटातील नेत्यांचं म्हणणं मात्र काही वेगळं असल्याचं दिसतंय.

मुख्यमंत्रीपदावरून अजितदादा गटाने महायुतीचा ताप वाढवला, प्रफुल्ल पटेल यांच्या थेट विधानाने खळबळ; काय बोलले नेमकं?
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल
Follow us on

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी थंडावते ना थंडावते तोच आता राज्यात विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. लोकसभेत महाराष्ट्रात भाजप आणि महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही. भाजपची तर पिछेहाटच झाली. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा परफॉर्मन्स बरा होता. मात्र अजित पवार गटाचा अवघा एकच खासदार निवडून आल्याने त्यांना महायुतीचा फारसा फायदा झाला नसल्याचे दिसून आले. मात्र असे असले तरी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप, शिंदे गट (शिवसेना) आणि अजित पवार गट ( राष्ट्रवादी काँग्रेस) हे एकत्रच निवडणूक लढवणार आहेत. पण तरीही या निवडणुकीत मोठा भाऊ कोण असेल, कोणाच्या नेतृ्त्वाखाली निवडणूक लढवणार, मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण अशा अनेक विषयांवर विविध पक्षाच्या नेत्यांची मत-मतांतरं दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात विधानसभा निवडणूका लढणार असं भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते घसाफोड करून सांगत असले तरी अजित पवार गटातील नेत्यांचं म्हणणं मात्र काही वेगळं असल्याचं दिसतंय.

अजित पवार गटाचे नेते, प्रफुल्ल पटेल यांनी नुकत्याच केलेल्या एका विधानामुळे तर महायुतीत एकमत नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. ‘ उद्याची निवडणूक आम्ही सगळेच एकत्र लढवणार आहोत. त्याच्यानंतर जे काही असेल ते त्याबाबत (मुख्यमंत्रीपद) सर्वजण बसून निर्णय घेतील. आजच त्याबद्दल चर्चा करणं योग्य नाही ‘ असे म्हणत प्रफुल पटेल यांनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा अद्याप निश्चित नसल्याचे अप्रत्यक्षरित्या सुचवल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्याच्या या विधानामुळे महायुतीच्या डोक्याचा ताप मात्र वाढलाय हे नक्की.

काय म्हणाले प्रफुल्ल पटेल ?

सध्या महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. त्यांच्या नेतृत्वात काल बजेट सादर झालं, त्यांच्याच नेतृत्वात विधानसभा निवडणूक लढणार. निवडणूकी नंतर आम्ही (मुख्यमंत्रि‍पदाबाबत) ठरवू. इतरांना काय घाई आहे ? विधानसभा निवडणूकीत तिन्ही पक्ष महायुती आणखी मजबूत करुन लढणार. कालंच माझी जे.पी नड्डा आणि अमित शहा यांची भेट झाली. त्यांनी सांगितलं की हे काय उलट सुलट बातम्या चालल्या. आम्ही तिघंही एकत्र लढणार, काही वादावादी होणार नाही. योग्य पद्धतीनं जागेचं वाटप होणार. महायुती म्हणून लोकांचा आशिर्वाद मागणार. असं पटेल यांनी सांगितलं.

विरोधकांसाठी अंगूर खट्टे आहेत

काल अर्थमंत्री अजीत पवार यांनी सादर केलेलं बजेट सर्वांना न्याय देणारं आहे. लाडकी बहीण योजनेतून महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न आहे. सत्तेत असतात, त्यांना बजेट सादर करावं लागते, टीका करणं हे विरोधकांचं कामच आहे. हे निवडणुकीचं बजेट नाही. विरोधकांनी कधी बजेटचं स्वागत केलं का? त्यांच्यासाठी अंगूर खट्टे आहेत, हे असं उदाहरण आहे. विरोधकांनी आपल्या काळात कोणाला काय दिलं? ज्यांनी टीका केली त्यांचे सरकार असताना त्यांनी काय दिलं. चांगलं होत असेल तर कधी स्वागत करावं, मोठेपणा दाखवावा, असा टोला पटेल यांनी लगावला.

विमानतळाचे छत कोसळणे दुर्दैवी, त्यावरून राजकारण नको

राजधानी दिल्लीत काल इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचं छत कोसळून एकाचा मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले. त्यावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधत टीका केली. मात्र हे चुकीचं असल्याचे पटेल म्हणाले.
दिल्ली विमानतळाचे काम होऊन १५ वर्षानंतर काही घटना घडल्या तर त्या काळातील व्यक्ती जबाबदार असते, असं काही असते का? विरोधकांना काहीही मुद्दा काढायचा असतो. जे झालं ते दुर्दैवी आहे. सरकार चौकशी करत आहे. आपण त्याची वाट बघावी .विमानतळाचं काम खासगी करणात झालं. आणि १५ वर्षानंतर काही घटना घडली तर त्याचं खापर सरकारवर फोडणं योग्य नाही, असे पटेल म्हणाले.