सुनील तटकरे यांना खोचक सवाल करत मुख्य प्रवक्ता उमेश पाटील यांचा राजीनामा

| Updated on: Oct 22, 2024 | 9:29 PM

"आम्ही खानदानी पाटील असल्याने लग्नाच्याही आधी पोरी नासवण्याचा आम्हाला अधिकार आहे, "माझ्या मुलांनी वयाच्या 17 व्या वर्षी 302 ची कलमे भोगली असल्याने, आम्ही खानदानी गुन्हेगार व दहशतवादी असल्याचे" वक्तव्य केले होते. शिवाय त्याचा आम्हाला अभिमान असल्याचे देखील म्हटले होते. असा खानदानी पाटील आपल्या पक्षात असल्याचा, अध्यक्ष म्हणून आपल्यालाही अभिमान वाटतोय का?", असा सवाल उमेश पाटील यांनी केला.

सुनील तटकरे यांना खोचक सवाल करत मुख्य प्रवक्ता उमेश पाटील यांचा राजीनामा
सुनील तटकरे यांना खोचक सवाल करत मुख्य प्रवक्ता उमेश पाटील यांचा राजीनामा
Follow us on

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ता उमेश पाटील यांनी आपल्या मु्ख्य प्रवक्ता पदाचा अखेर राजीनामा दिला आहे. उमेश पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना अधिकृतपणे राजीनामा पाठवत भूमिका मांडली आहे. या राजीनाम्यात त्यांनी आमदार यशवंत माने आणि माजी आमदार राजन पाटील यांच्याविरोधात भूमिका मांडली आहे. “मोहोळ येथील जनसन्मान यात्रे निमित्त आल्यानंतर आपण व अजित दादांनी माझ्या बाबतीत पक्ष शिस्तीच्या संदभनि काही विधाने केली. अर्थात तो आपला अधिकार आहे. मी सध्या पक्षाच्या मुख्य प्रवक्ता या पदावर असताना मोहोळ विधानसभेचे पक्षाचे विद्यमान आमदार यशवंत माने आणि माझी आमदार राजन पाटील यांच्यावर सातत्याने जाहीर टीका करत असल्याने मी पक्षाची शिस्त एकदा नव्हे तर अनेकवेळा मोडली आहे हे मला मान्य आहे. म्हणून मी विनम्रपणे पक्षाच्या मुख्य प्रवाक्ता पदाचा राजीनामा देत आहे”, असं उमेश पाटील आपल्या राजीनाम्यात म्हणाले आहेत.

मोहोळचे आमदार यशवंत माने सुप्रिया ताई सोबत गाडीत बसून गेले. राजन पाटलांनी महायुतीचा खासदार पाडल्याबद्दल विजयसिंह मोहिते पाटलांचा घरी आणून सत्कार केला. रामराजे नाईक निंबाळकर यांनी उघडपणे तुतरीचा प्रचार केला. नरहरी झिरवाळ यांचा मुलगा जयंत पाटलांना भेटायला गेला. आमदार बबनदादा शिंदे पवार साहेबांना भेटायला गेले. राजन पाटलांनी मागच्या महिन्यात त्यांच्या मुलाच्या वाढदिसानिमित्त केलेल्या जाहिरातीमध्ये अजित दादा आणि तुमचा फोटो न टाकता रोहित पवार आणि रोहित पाटील यांचे फोटो टाकले, असं उमेश पाटील म्हणाले.

“आमदार यशवंत माने यांनी तुतारीचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष करून विकास कामांची उद्घाटने केली. अशी शेकडो पक्ष शिस्तीची उदाहरणे देता येतील. परंतु हे सर्व प्रस्थापित मातब्बर नेते असल्याने कदाचित थोडीफार पक्ष शिस्त मोडण्याची त्यांना सवलत असेल. सामान्य कुटुंबातील माझ्या सारख्या विस्थापित कार्यकर्त्यांना कदाचित ही सवलत नसेल, हे मी समजू शकतो”, अशी खंत उमेश पाटील यांनी व्यक्त केली.

उमेश पाटील यांचा तटकरेंना खोचक सवाल

“राजकीय गरज म्हणून अजित दादांचा पुतळा जाळणाऱ्या राजन पाटील व त्यांच्या दोन्ही मुलांची बेशिस्ती आपण निर्लेखित केली. भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राजन पाटील यांनी, “आम्ही खानदानी पाटील असल्याने लग्नाच्याही आधी पोरी नासवण्याचा आम्हाला अधिकार आहे, “माझ्या मुलांनी वयाच्या 17 व्या वर्षी 302 ची कलमे भोगली असल्याने, आम्ही खानदानी गुन्हेगार व दहशतवादी असल्याचे” वक्तव्य केले होते. शिवाय त्याचा आम्हाला अभिमान असल्याचे देखील म्हटले होते. असा खानदानी पाटील आपल्या पक्षात असल्याचा, अध्यक्ष म्हणून आपल्यालाही अभिमान वाटतोय का?”, असा सवाल उमेश पाटील यांनी केला.

‘राजन पाटलांवर पक्ष शिस्तीची कारवाई का केली नाही?’

“आपल्या लाडक्या बहिणींना लग्नाच्या आधी नासवण्याचा उद्योग करणाऱ्या, दहशतीचे व गुंडागर्दीचे उदात्तीकरण करणाऱ्या व त्याचा अभिमान बाळगणाऱ्या राजन पाटील व त्याच्या मुलांना विरोध करणे तुमच्या राजकीय शिस्तीत बसत नसेल, परंतु छत्रपती शिवरायांच्या राज्यात अशा पाटलाला हातपाय कलम करून त्याचा चौरंग करण्याची शिक्षा दिली जात होती. कारण छत्रपती शिवराय हे प्रस्थापितांचे नव्हे तर विस्थापितांचे राजे होते. आपण शिवरायांच्या राजधानीचे खासदार असताना अशी महिलांची व माता भगिनींची विटंबना करण्याची निर्लज्ज वक्तव्य करून त्याचा अभिमान बाळगत असल्याची वक्तव्यं करणाऱ्या राजन पाटलांवर पक्ष शिस्तीची कारवाई का केली गेली नाही?”, असाही सवाल उमेश पाटील यांनी केला.

“शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचे विचार आणि यशवंतराव चव्हाण साहेबांचा वारसा सांगणाऱ्या पक्षात असा विकृत ‘खानदानी पाटील” सार्वजनिक जीवनातून हद्दपार करणे हे माझे कर्तव्य समजून मी राजन पाटलांच्या विरोधात काम करत आहे. त्यामुळे मी पक्षाच्या मूलभूत विचारधारेशी कटिबध्द आहे. पक्षाचे अध्यक्ष म्हणून तुम्ही मला साथ देण्याची अपेक्षा असताना माझ्यावरच पक्ष शिस्तीच्या संदर्भाने टिपण्णी करणे आपल्याकडून अपेक्षित नव्हते. तरीही माझे काही चुकत असल्यास जरूर माझा राजीनामा मंजूर करावा व जमल्यास क्षमा करावी ही विनंती”, असं उमेश पाटील म्हणाले.