‘जे छोटे-मोठे नेते राजकीयदृष्ट्या भुंकत असतात…’, रोहित पवार यांची सदाभाऊ खोत यांच्यावर सडकून टीका

| Updated on: Oct 14, 2024 | 10:09 PM

"सदाभाऊ खोत हे त्यांचं काम करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी पवार कुटुंबियांवरतीच बोलण्यासाठी त्यांना पद दिलं आहे. त्यामुळे ते बोलले असावेत. पण जे छोटे- मोठे नेते राजकीयदृष्ट्या भुंकत असतात यामागे कर्ताधर्ता एकच आहे ते म्हणजे देवेंद्र फडणवीस", अशी टीका रोहित पवारांनी खोत यांच्यावर केली आहे.

जे छोटे-मोठे नेते राजकीयदृष्ट्या भुंकत असतात..., रोहित पवार यांची सदाभाऊ खोत यांच्यावर सडकून टीका
सदाभाऊ खोत आणि रोहित पवार
Follow us on

अहिल्यानगरच्या कर्जत येथे आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून भक्ती शक्ती ध्वजाचं लोकार्पण करण्यात आलं. कर्जत शहरातील नागेश्वर मंदिरासमोर या भक्ती-शक्ती ध्वजाचं लोकार्पण करण्यात आलं. या सोहळ्यासाठी राज्यातील महंतांना आमंत्रित करण्यात आलं होतं. सर्वच भाविकांची इच्छा होती की, श्री गोदड महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कर्जत भूमीत असा भव्यदिव्य ध्वज असावा. ती इच्छा आज पूर्ण झाली, अशी भावना यावेळी आमदार रोहित पवारांनी व्यक्त केली.

रत्नागिरी येथे बोलताना भाजप नेते सदाभाऊ खोत यांनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवारांवर टीका करताना, शरद पवार यांना वळू बैलाची उपमा देत, पापी असल्याचं वक्तव्य केलं. या टीकेला रोहित पवार यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर देत सदाभाऊ खोत यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भुंकण्यासाठी ठेवलेल्या कुत्र्याची उपमा दिली. “सदाभाऊ खोत हे त्यांचं काम करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी पवार कुटुंबियांवरतीच बोलण्यासाठी त्यांना पद दिलं आहे. त्यामुळे ते बोलले असावेत. पण जे छोटे- मोठे नेते राजकीयदृष्ट्या भुंकत असतात यामागे कर्ताधर्ता एकच आहे ते म्हणजे देवेंद्र फडणवीस”, अशी टीका रोहित पवारांनी खोत यांच्यावर केली आहे.

‘उद्धव ठाकरे यांची एन्जोप्लास्टी झाली म्हणून ते थांबणार नाहीत’

उद्धव ठाकरे यांची एन्जोप्लास्टी झाली म्हणून ते थांबणार नाहीत, असं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे. याआधीही त्यांचे अशा शस्त्रक्रिया झाल्या. मात्र ते लोकसभा निवडणुकीमध्ये सक्रिय राहिले. उद्धव ठाकरे काही दिवस आराम करतील. त्यानंतर ते त्यांचा पक्ष आणि त्यांचे कॅडर आणि त्यांच्यासोबत आम्हीही जोरदार प्रचार करू, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

‘हे सरकार सर्वसामान्यांचे सरकार नसून गुंड प्रवृत्तीच्या लोकांचं’

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. खून, अत्याचार, कोयता गॅंग अशा घटनेत वाढ झाली असून सत्तेतील नेतेच सुरशित नसल्याचे रोहित पवार यांनी म्हटलं आहे. महायुती सत्तेतील नेतेच जर स्टेजवरून गुंडागर्दीची भाषा करत प्रचारामध्ये गुंडांचा वापर करत आहेत. त्यामुळे हे सरकार सर्वसामान्यांचे सरकार नसून गुंड प्रवृत्तीच्या लोकांचं सरकार असल्याचं रोहित पवार यांनी म्हटले आहे.