‘अकोल्यात काँग्रेसचाच खासदार जिंकून येईल’, नाना पटोले यांनी प्रकाश आंबेडकर यांना डिवचलं?

| Updated on: Oct 27, 2023 | 7:34 PM

प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी पक्ष 2019 च्या विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. अनेक दिग्गज नेत्यांचा वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमुळे पराभव झाला होता. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी पक्ष आगामी निवडणुकांमध्ये गेमचेंजर ठरु शकतो. पण तरीही इंडिया आघाडीत वंचित बहुजन आघाडी पक्षाला समाविष्ट करुन घेण्यात आलेलं नाही. याउलट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठं वक्तव्य केलंय.

अकोल्यात काँग्रेसचाच खासदार जिंकून येईल, नाना पटोले यांनी प्रकाश आंबेडकर यांना डिवचलं?
Follow us on

अकोला | 27 ऑक्टोबर 2023 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष कामाला लागला आहे. प्रत्येक पक्षाच्या गोटात वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे भाजपचा पराभव करण्यासाठी देशभरातील अनेक महत्त्वाचे विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. या विरोधी पक्षांच्या निर्माण झालेल्या आघाडीला इंडिया आघाडी असं नाव ठेवण्यात आलं आहे. इंडिया आघाडीच्या गोटात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटप आणि इतर रणनीतीबाबत खलबतं घडत आहेत. महाराष्ट्रातही तशाच घडामोडी घडत आहेत. पण महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी पक्षाला अद्याप इंडिया आघाडीत समाविष्ट करुन घेण्यात आलेलं नाही.

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे गटासोबत मैत्री केली आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका दोन्ही पक्ष एकत्र लढवणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. पण ठाकरे गट इंडिया आघाडीत सहभागी आहे. तर प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडीत सहभागी झालेले नाहीत. प्रकाश आंबेडकर यांनी इंडिया आघाडीत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केलीय. पण काँग्रेसकडून त्यांना अजूनही प्रस्ताव देण्यात आलेला नाही.

नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य

विशेष म्हणजे प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट देखील घडून आली आहे. शरद पवार प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीत सहभागी करुन घेण्याबाबत सकारात्मक असल्याचीही चर्चा आहे. असं असलं तरी काँग्रेसकडून वेगळीच भूमिका घेण्यात आली आहे. प्रकाश आंबेडकर अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतात. पण आगामी लोकसभा निवडणुकीत अकोला मतदारसंघातून काँग्रेसचाच उमेदवार निवडून येईल, असं मोठं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. त्यामुळे नाना पटोले यांनी या वक्तव्यातून प्रकाश आंबेडकर यांना डिवचल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

नाना पटोले आज अकोला दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी याबाबत वक्तव्य केलं. अकोल्याचा खासदार काँग्रेसचाच बनणार, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केलाय. विधान परिषदेत अशाप्रकारे उमेदवार निवडून आणला होता. तर आता खासदार आणू, असं नाना पटोले म्हणाले आहेत.

राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

दुसरीकडे प्रकाश आंबेडकर अकोला लोकसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. ते याच मतदारसंघातून दोनवेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे काँग्रेसला आगामी लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीत खरंच सहभागी करुन घ्यायचं नाही का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. दरम्यान, नाना पटोले प्रकाश आंबेडकर यांच्या या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया देतात, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.