नक्षलवाद्यांचा गडचिरोलीत पुन्हा हैदोस, तिघांची हत्या, नंतर प्रशासनाला इशारा देणारं पत्र समोर

| Updated on: Nov 25, 2023 | 7:15 PM

गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी पुन्हा डोकंवर काढलं आहे. नक्षलवाद्यांनी तब्बल तीन जणांची एकामागे एक हत्या केली आहे. नक्षलवाद्यांनी दुसरी हत्या केल्यानंतर प्रशासनाला इशारा देणारं पत्र जारी केलं होतं. हे पत्र 'टीव्ही 9 मराठी'च्या हाती लागलं आहे. या पत्रात त्यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे.

नक्षलवाद्यांचा गडचिरोलीत पुन्हा हैदोस, तिघांची हत्या, नंतर प्रशासनाला इशारा देणारं पत्र समोर
Follow us on

मोहम्मद इरफान, Tv9 मराठी, गडचिरोली | 25 नोव्हेंबर 2023 : गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांकडून हत्यासत्र सुरूच आहे. नक्षलवाद्यांनी गडचिरोलीत एका आठवड्यात तीन नागरिकांचा बळी घेतला आहे. त्यामुळे गेल्या वर्षापासून शांत असलेला गडचिरोली जिल्हा नक्षलवाद्यांच्या हैदोसामुळे पुन्हा दहशतीत आला आहे. हत्येच्या घटनांमुळे नागरीकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. विशेष म्हणजे नक्षलवाद्यांनी हत्येनंतर लिहिलेली पत्र ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती लागलं आहे. नक्षलवाद्यांनी पहिली हत्या ही पिपली पोर्गी येथून 40 किलोमीटर अंतरावरुन एका नागरिकाची केली. दुसरी हत्या एटापली तालुक्यातील सुरजागड नजीक पोलीस पाटलाची केली. तर नक्षलवाद्यांनी तिसरी हत्या अहेरी तालुक्यातील राजाराम खांदला येथे केलीय. नक्षलवाद्यांनी एका युवकावर गोळ्या झाडून हत्या केली.

गडचिरोली दिवसात गेल्या काही दिवसांमध्ये काही महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहे. पोलिसांनी या आठवड्यात नवीन पोलीस स्टेशन उभारलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी अतिसंवेदनशील भागात असलेल्या पिंपरी बुर्गी पोलीस स्टेशनला भेट दिली होती. मुख्यमंत्र्यांनी या पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट देवून दिवाळी साजरी केली होती. तसेच दोन आठवड्यांपूर्वी गडचिरोलीत शांततेत ग्रामपंचायत निवडणूक पार पडली होती. या सगळ्या घटनांचा निषेध म्हणून नक्षलवाद्यांनी दहशत पसरवण्यास सुरुवात केली आहे.

नक्षलवाद्यांकडून तीन जणांची हत्या

नक्षलवाद्यांनी 16 नोव्हेंबरला भामरागड तालुक्यातील पेनगुंडा येथे दिनेश गावडे, 23 तारखेला एटापल्ली तालुक्यातील टिटोळा येथील पोलीस पाटील लालसू वेडदा यांची हत्या केली होती. त्यानंतर अहेरी तालुक्यातील राजाराम खांदला येथे एका 27 वर्षीय युवक रामजी आञाम यांची पोलीस खबऱ्याच्या संशयाने हत्या केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

पत्रात नेमकं काय म्हटलं आहे?

माओवाद्यांच्या गडचिरोली डिविजन कमिटीचं पत्र ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती लागलं आहे.  हे पत्र दुसऱ्या हत्येनंतरचं आहे. त्यामध्ये त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. “टिटोडा ग्रामपंचायत पोलीस पाटील लालसू वेडदा पीएलडीएने मृत्यूदंडाची शिक्षा दिली आहे. सुरजागड खदान सुरु झाल्यानंतर पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसभा अध्यक्ष, सचिव सारखे जनतेच्या विरोधातील लोक, दलाल, भ्रष्ट लोक व्यवस्था आणि खदान मालकांसोबत मिलिभगत करुन इथल्या स्थानिकांची दिशाभूल करत आहेत. ते स्थानिक तरुणांना नोकरीचं आणि पैशांचं आमिष देवून इथली मौल्यवान खनिज संपत्तीचा ऱ्हास करत आहेत”, असं पत्रात म्हटलं आहे.

“इथले खदान मालक, नेतेमंडळी, हेडरी उपविभागीय पोलीस अधिकारी लालसू पटेल यांच्या मृत्यूला जबाबदार आहेत. कारण राजकीय नेते आणि हेडरीच्या एसडीपीओ कंपनीच्या मालकांचे एजंट आहेत. ते कंपनीकडून लाखो रुपये घेऊन त्यांची राखनदारी करतात. इथल्या ग्रामविकास अधिकाऱ्याला बाजूला करुन ते अवैधप्रमाणे उत्खननाचं काम करतात”, असा आरोप या पत्रात करण्यात आलाय.

“आदिवासी आपली जल जंगल, जमीन इज्जत आणि अधिकारांसाठी झगडत आहेत. जनतेचा संघर्ष दाबण्यासाठी इथले स्थानिक जनतेचे विरोधक हे काही जणांना भ्रष्ट बनवून आपल्या बाजूने वळवत आहेत. या दरम्यान लालसू वेडदा हा सुजागड खदानचा दलाल बनून काम करत होता. तो ग्रामसभेत लोकांना धमकावत होता. परिसरात आणखी काही भ्रष्ट जनतेच्या विरोधातील आणि लालसी माणसं आहेत. ही माणसं व्यवस्था आणि पोलीस विभागासोबत मिळून खदानाच्या बाजूने काम करत आहेत. अशा परस्थितीत आमच्या माओवादी पक्षाकडून सूचित करण्यात येतंय की, आमच्या सोबत राहा, सुधरा, नाहीतर जनता तुम्हाला माफ करणार नाही”, असा इशारा माओवाद्यांनी पत्रातून दिलाय.

पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात ऑपरेशन सुरू

गडचिरोली जिल्ह्यात नक्षलविरोधी पोलीस पथक गडचिरोली पोलीस, राज्य राखीव पोलीस दल आणि केंद्रीय राखीव पोलीस दलामार्फत गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड एटापल्ली धानोरा कुरखेडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात ऑपरेशन सुरू आहे. या पोलीस ऑपरेशनला वैतागलेले नक्षलवादी सतत हत्येचा कट रचत आहेत. लालसू वेडदा आणि रामजी आत्राम या दोघांच्या हत्येसाठी 50 ते 60 नक्षलवादी आल्याची पोलीस विभागाच्या अनेक अधिकाऱ्यांमध्ये चर्चा आहे. नक्षलवाद्यांनी या हत्या करण्यासाठी काही गावकऱ्यांच्या मदत घेतल्याची चर्चाही पोलीस विभागात सुरू होती.