शिर्डी : शिर्डीच्या साईबाबांची ख्याती महाराष्ट्र आणि देशातच नाही तर जगभरात पोहोचलेली आहे. त्यामुळेच दररोज हजारो भाविकांचे पाय शिर्डीकडे वळलेले दिसतात. हे भाविक साईबाबांचं मनोभावे दर्शन घेतात आणि आपआपल्या कुवतीनुसार साईचरणी भेटही अर्पण करतात. काही लोक सोनं अर्पण करतात. काही चांदी देतात. काही नाणी तर काही नोटा अर्पण करतात. जसा नवस तशी भेट साईबाबांना दिली जाते. मनोकामना पूर्ण झाल्यावर भक्त करोडो रुपयांचे दान करतात. मात्र आता हे दानच आता डोकेदुखी ठरताना दिसत आहे. हजारो किलोंची नाणी साई मंदिर ट्रस्टकडे जमा झालेली आहे. ही नाणी ठेवायची कुठे? असा प्रश्न फक्त साई मंदिर ट्रस्टलाच नाही तर बँकांनाही पडला आहे.
बँक प्रशासनाच्या मते आता ग्राहक नाणी घेत नाहीत. ही नाणी ठेवण्यासाठी जागाही नाही. साडे तीन ते चार कोटी रुपयांची नाणई ठेवण्यासाठी ना ट्रस्टकडे जागा आहे ना बँकेकडे, असं सांगितलं जातं. एका वृत्तवाहिनीने हे वृत्त दिलं आहे.
साई मंदिरात भक्त एक रुपयांपासून ते करोडो रुपयांपर्यंतचं दान करतात. आठवड्यातून दोन वेळ कॅश काऊंटिंग होत असते. दान म्हणून मिळालेली नाणी बँकेत जमा केली जातात, असं साईबाबा मंदिर ट्रस्टचे सीईओ राहुल जाधव यांनी सांगितल्याचं एका वृत्तवाहिनीच्या वृत्तात म्हटलं आहे. बँकांकडून हजारो किलो वजनाची नाणी घेण्यास नकार मिळत आहे. गेल्या काही वर्षापासून मिळालेलं नाण्यांचं दान विविध 13 राष्ट्रीयकृत बँकांमध्ये जमा केले जाते. आता या बँकांकडेही नाणी जमा करून ठेवण्यासाठीची जागा उरलेली नाहीये.
अन्य बँकांमध्ये अकाऊंट खोलण्याचा कमिटीने निर्णय घेतला आहे. असं केल्याने थोडा दिलासा मिळेल. आरबीआयनेही आमची नाणी ठेवण्याची समस्या दूर करावी अशी आमची विनंती राहील, असं सीईओ राहुल जाधव यांनी सांगितलं.
विशेष म्हणजे या नाण्यांमुळे ट्रस्टी, बँकच त्रस्त नाही तर नाणी ठेवण्यात येणाऱ्या बिल्डिंगच्या खाली काम करणारे व्यापारीही भयभीत झालेले आहेत. या हजारो किलो वजनाच्या नाण्यांच्या वजनामुळे इमारत कोसळण्याची भीती या व्यापाऱ्यांना वाटत आहे. ही नाणी लवकरात लवकर इमारतीतून हटवली पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे. ऑनलाइन पेमेंटमुळे रोख रकमेचा व्यवहार कमी झाला आहे. लोक आता रोख रक्कम खिशात ठेवत नाही. त्यामुळेच ही समस्या उद्भवल्याचं सांगितलं जातं.