शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी आपल्या पक्षाच्या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार येणार होते. मात्र दिल्लीच्या राजकारणात उलाढाल होणार आहे. त्यामुळे इथे थांबावं लागतंय, असं शरद पवार यांनी सांगितलं आहे, असा गौप्यस्पोट जयंत पाटील यांनी केला आहे. त्यांच्या या गौप्यस्फोटावर प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “दिल्लीच्या राजकारणात काहीही होणार नाही. आमच्या NDA च्या सर्व घटकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान केलं आहे. दिल्लीच्या सरकारकडून इतके चांगल्या योजना देशात आणल्या जात आहेत. तरीही विरोधक हतबल झाले आहेत, हे यावरून दिसून येते. भाषणात कितीही जोर दाखविला तरी विरोधक किती घाबरलेले आहेत यावरून दिसून येते”, अशी प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी दिली.
देशाच्या राजकारणात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. खुद्द राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी शेकाप नेते जयंत पाटील यांना याबाबत माहिती दिली आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या अधिवेशनात जयंत पाटील यांनी याबाबतची माहिती जाहीर केली आहे. आपल्या शरद पवार यांच्याकडूनच याबाबत माहिती मिळाल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं. देशाच्या राजकारणामध्ये दिल्लीत येत्या महिन्यात मोठ्या उलाढाली होणार आहेत. यासाठी आपण शेकाप अधिवेशनासाठी येऊ शकणार नाही, अशी माहिती खुद्द शरद पवार यांनी आपल्याला दिली, असा दावा जयंत पाटील यांनी केला. शरद पवार यांनी आपल्याला फोन करुन याबाबत माहिती दिल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं. दरम्यान, यावरुन राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
महाराष्ट्रात आगामी काळात विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षात मोठ्या घडामोडी घडत आहेत. प्रत्येक पक्ष कामाला लागला आहे. विधानसभेत सर्वाधिक जागांवर निवडणूक लढायची आणि सर्वाधिक जागा जिंकून आणायच्या, असं प्रत्येक पक्षाचं ध्येय आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीत जागावाटपावरुन रस्सीखेंच सुरु आहे. असं असताना दिल्लीच्या राजकारणात घडणाऱ्या घडामोडी महत्त्वाच्या आहेत. जयंत पाटील यांनी केलेल्या दाव्यानुसार शरद पवार यांनी खरंच तसं कारण दिलं असेल तर कदाचित खरंच देशाच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडू शकते. अर्थात संबंधित घटना खरंच घडतात का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी अजित पवार वेशांतर करून दिल्लीला जात होते, असं बोलताना मोठा दावा केला. ही माहिती स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी दिली आहे, असं संजय राऊत म्हणाले. यावरुन प्रफुल्ल पटेल यांनी संजय राऊत यांचा चांगला समाचार घेतला. “कोण सकाळी एकदा भोंगा सुरू करतो आणि त्याच्यावर लोकांनी दिवसभर उत्तर देत राहावं हे काही खरं नाही. आम्ही आमच्या केलेल्या कामाच्या भरोशावर निवडणुकीला सामोरे जात आहोत. असे फालतू लाऊड्स स्पीकर आम्ही सकाळी लावत नाहीत आणि लोकांची दिशाभूल करण्याचं काम आम्ही अजिबात करत नाही” असा टोला प्रफुल पटेल यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.