राहुल गांधींनी आरक्षणावरुन केलेल्या विधानाविरोधात वंचितचं आंदोलन

| Updated on: Sep 14, 2024 | 11:46 PM

राहुल गांधींनी आरक्षणावरुन केलेल्या विधानाविरोधात भाजपनंतर आज वंचित आघाडीनं आंदोलन केलं. मात्र हे आंदोलन वकील असीम सरोदेंच्या कार्यालयाबाहेर करण्यात आलं. त्यामागचं कारण काय. आणि आरक्षणावरन राहुल गांधी नेमकं म्हणाले काय.

राहुल गांधींनी आरक्षणावरुन केलेल्या विधानाविरोधात वंचितचं आंदोलन
Follow us on

भाजपनंतर आता वंचित बहुजन आघाडीनं राहुल गांधींवर आरक्षण संपवण्याच्या विधानाचा आरोप करत आंदोलन केलं.. मात्र हे आंदोलन वकील असीम सरोदेंच्या पुण्यातील कार्यालयाबाहेर करण्यात आलं. लोकसभेवेळी सरोदेंसह इतरांनी निर्भय बनोच्या माध्यमातून सभा घेतल्या होत्या. महाविकास आघाडीला मतदानाचं आवाहन केलं होतं. त्यामुळे आता राहुल गांधींच्या विधानावर वंचितनं सरोदेंविरोधात घोषणा दिल्या. आता राहुल गांधी नेमकं काय बोलले होते., त्याचा अर्थ वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी काय सांगितला आहे. ते पाहूयात.

काही दिवसांपूर्वी भाजपनंही राहुल गांधींविरोधात आंदोलन छेडलं होतं. त्यानंतर वंचितनं छेडलेल्या या आंदोलनाला काँग्रेसनं भाजप पुरस्कृत आंदोलन म्हटलं आहे. देशात बहुसंख्य वर्ग एससी-एसटी-ओबीसी असूनही निर्णयप्रक्रियेत त्यांची संख्या कमी आहे. जेव्हा हे चित्र सुधारेल ही असमानता दूर होईल., तेव्हा आरक्षण थांबवण्याचा विचार होईल असं राहुल गांधी म्हणाले होते. मात्र नंतर सोशल मीडियात फक्त शेवटच्या वाक्याचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील शुक्रवारी म्हटले की, दलित समुदाय आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या वक्तव्याविरोधात देशव्यापी जोडे मारो आंदोलन सुरू करणार आहेत. नुकतेच अमेरिकेतील जॉर्जटाउन युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले होते की, काँग्रेस तेव्हाच आरक्षण संपवण्याचा विचार करेल जेव्हा देशात सर्वांना समान संधी मिळू लागेल आणि सध्या अशी परिस्थिती भारतात नाही.

आरक्षण कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही – आठवले

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरुन आठवले म्हणाले की, दलित, इतर मागासवर्गीय आणि आदिवासींचे आरक्षण कोणीही हिरावून घेऊ शकत नाही आणि जर कोणी असा प्रयत्न केला तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. केंद्रीय मंत्री आठवले म्हणाले की, “आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल दलित समाज आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया देशव्यापी जोडे मारो  आंदोलन सुरू करणार आहे. “ते निरुपयोगी माणूस आहे. ते जेव्हा कधी इंग्लंड किंवा अमेरिकेत जातात तेव्हा भारताविरोधात बोलतात. राहुल गांधींनी आक्षेपार्ह विधान करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.