महाराष्ट्रात पहिल्यांदाच घरात बसून मतदानाची सुविधा, निवडणूक आयोगाकडून मोठी बातमी

| Updated on: Feb 23, 2024 | 9:39 PM

महाराष्ट्रात आता पहिल्यांदाच घरातून मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. निवडणूक आयोगाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे यांनी याबाबत माहिती दिली.

महाराष्ट्रात पहिल्यांदाच घरात बसून मतदानाची सुविधा, निवडणूक आयोगाकडून मोठी बातमी
Follow us on

योगेश बोरसे, Tv9 प्रतिनिधी, पुणे | 23 फेब्रुवारी 2024 : 80 वर्षांपुढील ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांसाठी घरातूनच मतदान करण्याची सुविधा देणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी पुणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. “ज्येष्ठ नागरिकांनी निवडणूक घोषित झाल्यानंतर 5 दिवसाच्या आत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे ‘१२डी’क्रमांकाचा अर्ज सादर करावा. जिल्हाधिकारी यावर अंतिम निर्णय घेणार असून प्रत्यक्ष मतदानासाठी तात्पुरत्या मतदान केंद्राची उभारणी संबंधितांच्या घरी करणार आहे”, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली. “लोकसभा निवडणुक लवकरच जाहीर होतील. निवडणूक पूर्वतयारी दीड दोन महिन्यांपूर्वी सुरू झाली आहे. आता जिल्ह्यातील निवडणूक ऑफीस भेट सुरू आहेत. पुण्यात पहिली भेट आहे. आम्ही निवडणुकीची तयारी, पाहणी दौरा, आढाव बैठक घेतली. निवडणुकीमध्ये काही धोरणात्मक बदल झाले आहेत. घरी बसून यावेळी पहिल्यांदा मतदान करता येणार आहे. त्याला परवानगी दिली आहे. पण ८० वर्षांपेक्षा जास्त, दिव्यांग यांना घरी बसून मतदान करता येणार आहे. निवडणूक जाहीर झाली की १२डी फॉर्म या लोकांना पर्याय निवडण्यासाठी असतील, त्यांना घरपोच फॉर्म दिला जाईल. त्यांच्याकडून ऑप्शन देऊन जिल्हाधिकारी यांना देण्यात येईल”, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे यांनी दिली.

“मतदान असणार आहे, त्याअगोदर त्याचं मतदान करून घेण्यात येईल, मतदान मोठा उत्सव आहे. मतदान केंद्रावर येऊन करण्यासाठी आम्ही वृद्धांना सांगणार आहोत. त्यांच्याकडे पाहुन मतदानाला लोक बाहेर पडतील. घरात बसून मतदान याचा प्रयोग कसबा पोट निवडणुकीत करण्यात आला होता. घरी बसून व्हिडीओ रेकॉर्ड करून मतदान करता येणार आहे. कोणी मतदानापासून वंचित राहू नये यासाठी आमचा प्रयत्न आहे”, असं श्रीकांत देशपांडे यांनी सांगितलं.

‘निवडणुकीसाठी पोलीस सज्ज’

“निवडणुकीत पारदर्शकता यावी यासाठी ५० टक्के पोलीस स्टेशन वेब कास्टिंगला जोडली जाणार आहेत. काही ठरवल जात असतं त्यावेळी ५० टक्के पोलीस स्टेशन शोधले जाणार, गर्दीची क्रिटिकल पोलीस स्टेशन घेतली जाणार, कंट्रोल रूम करण्यात येणार, थेट लिंक निवडणूक आयोगाकडे पण जाते. निवडणुकीबाबत पोलीस तयारी पण सुरू आहेत. पण सुसज्ज आहेत”, अशी माहिती देशपांडे यांनी दिली.

निवडणूक काळात ‘या’ गोष्टींवर नियंत्रण ठेवलं जाणार

“निवडणूक काळात लिकर, ड्रग्ज, पैसे याच्यावर कंट्रोल आणण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. २२ डिपार्टमेंट आणि काही केंद्रीय यंत्रणा याबाबत काम करतील. यंत्रणा निहाय काम करणार आहेत. राज्यस्तरावर याचं काम केलं जाईल आणि अशा गोष्टींवर आळा बसेल”, असा दावा श्रीकांत देशपांडे यांनी केला. “दोन नवीन अॅप तयारी केली आहेत. सी विजेल अॅप करण्यात आलं आहे. यामुळे १०० मिनिटाच्या एखादी तक्रार आली तर त्यावर कारवाई होऊन सोडवली जाईल. के वाय सी अँपमध्ये आपल्याला एखाद्या उमेदवार बद्दल माहिती मिळेल की उमेदवारावर किती गुन्हे दाखल आहेत किंवा इतर माहिती मिळेल. आता नव्याने मतदारांना मतदान केंद्रावर गेलं की जो उमेदवार असेल त्याची माहिती, काम याबद्दल देण्यात येईल, जेणेकरुन मतदान कोणाला करावे याबद्दल मतदारांला कळेल”, असंही ते म्हणाले.

“मतदानाबद्दल उदासीनता आहे. तरुण वर्ग असेल किंवा ग्रामीण भागातील तरुण मुलांना घेऊन मतदान वाढविण्यासाठी मोहीम राबवली जाईल. पालक सभा घेतली जाईल. सर्व यंत्रणा सगळी निवडणूक मोडमध्ये आहे. निष्पक्षपणे निवडणूका होतील. पुढील दोन आठवड्यात निवडणूक आयोग महाराष्ट्रातील आढाव्यासाठी येणार आहे. कायद्यात तरतुद आहे त्यामुळे शिक्षकांना निवडणूक कामात घेतलं जातं. १२ कॅटॅगरी आहेत ज्यांना निवडणूक कामात घेतलं जातं”, अशी प्रतिक्रिया श्रीकांत देशपांडे यांनी दिली.