अजित पवारांच्या प्रत्येक गौप्यस्फोटाला शरद पवारांचं उत्तर, काय-काय म्हणाले?

| Updated on: Dec 02, 2023 | 5:18 PM

"माझ्याकडून कधीच बोलावलं गेलं नाही. मी पक्षाचा अध्यक्ष होतो. पक्षाच्या कोणत्याही सहकाऱ्याला कुठल्याही प्रश्नाच्या संबंधी माझ्याशी सुसंवाद ठेवायचा अधिकार होता. आमचे अनेक लोक वेगवेगळ्या विचारांचे होते. भाजपसोबत जाण्याच्या मागण्या झाल्या त्या संदर्भात चर्चा झाल्या नाहीत, असं मी म्हणत नाही. चर्चा झाली होती", असं शरद पवारांनी स्पष्ट केलं.

अजित पवारांच्या प्रत्येक गौप्यस्फोटाला शरद पवारांचं उत्तर, काय-काय म्हणाले?
Follow us on

पुणे | 2 डिसेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यात महत्त्वाची बैठक आयोजित केली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जत येथील शिबिरात शरद पवार यांच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याबाबत मोठा दावा केला होता. तसेच त्यांनी अनेक मोठे गौप्यस्फोट केले होते. त्यांच्या प्रत्येक गोप्यस्फोटांना शरद पवारांनी पत्रकार परिषदेत उत्तर दिलं. यावेळी त्यांनी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावरही निशाणा साधला. प्रफुल्ल पटेल यांनी आपण पुस्तक लिहून सर्व घटनांविषयी सविस्तर लिहू, असा इशारा दिला होता. त्यावर शरद पवारांनी टोला लगावला. प्रफुल्ल पटेल यांच्या दिल्लीतील घरावर ईडीने का कारवाई केली होती ते सुद्धा लिहावं, असा टोला शरद पवारांनी लगावला.

“मी आताच सांगत होतो की, आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आताच एक बैठक घेतली होती. या बैठकीला आमचे सिनियर नेते आले होते. राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळी स्थिती आहे. राज्यात अनेक भागांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतीचं, पिकांचं नुकसान झालंय. काही ठिकाणी पंचनामे सुरु आहेत. पण त्याचा वेग अत्यंत कमी आहे. शेतकरी अस्वस्थ आहेत. राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका घेतली पाहिजे. मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने शेतकऱ्यांसाठी वेळ दिला तर त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल, असा उद्देश बैठकीचा होता”, असं शरद पवारांनी सांगितलं.

“अजित पवार जे काही बोलले त्यातील बऱ्याच गोष्टी मला पहिल्यांदाच समजले. त्यांच्या बोलण्यात काही स्फोट होता का, वाव होता का या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल”, असा टोला शरद पवारांनी लगावला. अजित पवार गटाकडून भाजपसोबत जाण्याबाबत मोठा दावा करण्यात आला. भाजपसोबत जाण्याबाबत 2004 पासून चर्चा सुरु होती, असा दावा अजित पवार गटाने केला. तसेच काही महिन्यांपूर्वी झालेल्या बंडखोरीच्या घटनेवरही अजित पवार गटाकडून अनेक दावे करण्यात आले. त्यावरही शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलं.

‘भाजपसोबत जाण्याबाबत पक्षातील इतर सहकाऱ्यांसोबत चर्चा झाल्या’

“माझ्याकडून कधीच बोलावलं गेलं नाही. मी पक्षाचा अध्यक्ष होतो. पक्षाच्या कोणत्याही सहकाऱ्याला कुठल्याही प्रश्नाच्या संबंधी माझ्याशी सुसंवाद ठेवायचा अधिकार होता. आमचे अनेक लोक वेगवेगळ्या विचारांचे होते. ज्या संबंधीच्या मागण्या झाल्या त्या संदर्भात चर्चा झाल्या नाहीत, असं मी म्हणत नाही. चर्चा झाली होती. ते ज्या राजकीय पक्षासोबत जाण्याचा विचार करत होते तो विचार आम्हाला मान्य नव्हता”, असं शरद पवार म्हणाले.

“आमचे विचार भाजपच्या विचारांशी सुसंगत नाहीत. विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही लोकांकडे मते मागितली तेव्हा ती भाजपसोबत जाण्यासाठी नव्हती. ती एका विशिष्ट कार्यक्रमासाठी होती. एवढंच नाही, भाजप आणि तत्सम प्रमुख पक्ष यांच्याविरोधात होती. भाजपसोबत जाणं योग्य नाही, ज्या लोकांनी आपले विचार मान्य केले आहेत त्यांची ती फसवणूक आहे. त्यामुळे तसं करणं योग्य नाही, अशी भूमिका माझ्यासह पक्षातील इतर काही सदस्यांची होती”, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं.

‘आमच्यात भाजप आणि शिवसेनेबाबतच्या भूमिकेत फरक’

शिवसेनेच्या विरोधातही निवडणूक लढवली होती, मग शिवसेनेसोबत का सत्ता स्थापन केली? असा प्रश्न शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यावर त्यांनी त्यामध्ये फरक आहे, असं उत्तर दिलं. “आमची शिवसेना संदर्भातली भूमिका वेगळी होती. माझी आज त्याविषयी काय भूमिका आहे? आमची आजही भूमिका भाजपविरोधी आहे, तितकी शिवसेना विरोधी नाही. एवढंच नव्हे, जे लोकं असं सांगतात, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र बसून सरकार बनवण्याचा कार्यक्रम घेतला होता त्या कार्यक्रमाबाबत आज जे सांगतात ते मंत्रिपदाची जबाबदारी घेऊन पडद्यावर पांघरुन घातलेलं होतं हा फरक आहे”, असं शरद पवार म्हणाले.

‘मी राजीनामा देतो याचं कारण काय?’

अजित पवारांनी दावा केला की, तुम्ही अजित पवारांना सांगितलं की, तुम्हाला जी भूमिका घ्यायची आहे ती भूमिका घ्या, मी राजीनामा देतो, त्यांच्या या दाव्याबाबत शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. “मी राजीनामा देतो याचं कारण काय? मी पक्षाचा अध्यक्ष होतो. सामूहिक निर्णय झाला होता. सामूहिक निर्णयानंतर काही वेगळं करण्याचं कारण नव्हतं. आमची स्वच्छ भूमिका होती की, भाजपसोबत जायला नको”, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.