नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या आरोपांवर शरद पवार म्हणाले….

| Updated on: Jun 27, 2023 | 8:53 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आज गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या या आरोपांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मोदींच्या या आरोपांवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या आरोपांवर शरद पवार म्हणाले....
Follow us on

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप केला आहे. मोदींनी आज राष्ट्रवादीवर तब्बल 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. नरेंद्र मोदी यांनी कथित शिखर बँक घोटाळा, जलसिंचन घोटाळ्याचा उल्लेख करत राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. त्यांच्या या टीकेवर शरद पवार काय प्रतिक्रिया देतात याबाबत अनेकांना उत्सुकता होती. अखेर मोदींच्या आरोपांवर शरद पवारांनी भूमिका मांडली आहे. नरेंद्र मोदी यांच्या या आरोपांना शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं. शरद पवार यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना नरेंद्र मोदी यांच्या आरोपांवर भाष्य केलं.

शरद पवार नेमकं काय म्हणाले?

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांबद्दल काय बोललं पाहिजे, याचा नमुना देशासमोर ठेवला आहे. पंतप्रधानांनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांनी स्वतः विचार करण्याची गरज आहे. शिखर बँकेचा त्यांनी उल्लेख केला. मी कधी शिखर बँकेचा मेंबर नव्हतो. लोन कधी मी घेतले नव्हते. मी त्या संस्थेचा कधीच सदस्य नव्हतो”, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

“नरेंद्र मोदी यांनी जो उल्लेख केला त्यात शिखर बँक हे प्रकरण न्यायालयात गेले आहे. त्यात माझा शिखर बँकेसोबत काही संबंध नाही, हे स्पष्ट झालेलं आहे. खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव घेतले. त्यांचे काही कारण नाही. अशा इन्स्टिट्यूट सोबत त्या राहत नाहीत हे बहुतांश लोकांना माहीत आहे”, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

“देशातील विरोधी पक्षाचे लोक मोठ्या प्रमाणावर एकत्र येतात. देशाच्या समस्येबाबत चर्चा करतात. ही गोष्ट काही लोकांना पटत नाही. त्यामुळे अशा पद्धतीचे विधाने केली जातात. यापेक्षा अधिक काही बोलण्याची आवश्यकता नाही”, अशा शब्दांत शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं.

नरेंद्र मोदी यांनी नेमकी टीका काय केली?

पंतप्रधान नरेंद्र मोदी मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये भाषण करत होते. भोपाळमध्ये मोतीलाल नेहरु स्टेडियममध्ये ‘माझे बूथ, सर्वात मजबूत’ या मोहिमेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाषण करताना नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. विरोधी पक्षांची पाटण्यात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीवर टीका करताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला.

“राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल बोलायचं झालं तर, त्यांच्या पक्षावर जवळपास 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे. महाराष्ट्र राज्य शिखर बँक घोटाळा, सिंचन घोटाळा, अवैध खोदकाम घोटाळा अशी यांची मोठी यादी आहे”, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात केली.