Pune News : वीज चोरीचा असा प्रकार पहिलाच नसणार, तब्बल ६७ वर्षांपासून सुरु आहे वीजचोरी

| Updated on: Aug 05, 2023 | 1:12 PM

Pune News : राज्यातील शहरी अन् ग्रामीण भागात वीज पुरवठा आणि वीज बिल वसुली करण्याचे काम महावितरणकडून करण्यात येते. परंतु महावितरण कंपनीत वीज गळती अन् वीज चोरीचे प्रमाण मोठे आहे. आता धक्कादायक प्रकार समोर आलाय.

Pune News : वीज चोरीचा असा प्रकार पहिलाच नसणार, तब्बल ६७ वर्षांपासून सुरु आहे वीजचोरी
mahavitaran
Follow us on

सुनिल थिगळे, पुणे | 5 ऑगस्ट 2023 : महावितरण कंपनीकडून वीजचोरी रोखण्यासाठी अनेक प्रयत्न सुरु असतात. वीज चोरीला आळा बसावा, यासाठी महावितरणचे भरारी पथक असते. या पथकाकडून वीजचोरी विरुद्ध नियमित मोठ्या मोहिमा राबविण्यात येतात. तसेच ‘वीजचोरी कळवा अन् बक्षीस मिळवा’ ही योजनाही राबवली जाते. त्यानंतर महावितरणची वीज चोरी कमी झालेली नाही. अनेक ठिकाणी वीज चोरी अन् वीज गळती सुरु असते. परंतु आता वीज चोरीचा धक्कादायक प्रकार समोर आला. सरकारी कार्यालयाकडून तब्बल ६७ वर्षांपासून वीज चोरी केली जात होती.

काय आहे प्रकार

पुणे जिल्ह्यात दीर्घ कालावधीपर्यंत वीज चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. १९५६ पासून वीज चोरी होत असताना महावितरणला माहितीच नाही. विशेष म्हणजे ही चोरी एका सरकारी कार्यालयाकडून केली जात होती. म्हणजेच चक्क ग्रामपंचायत कार्यालय अनेक वर्षांपासून वीज चोरी करत होते. माहिती अधिकारातून ही माहिती समोर आली.

कुठे झाला प्रकार

पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील आंधळगाव ग्रामपंचायतीमध्ये हा प्रकार घडला आहे. ही ग्रामपंचायत सन १९५६ साली निर्माण झाली होती. परंतु आंधळगाव ग्रामपंचायत कार्यालयाने आजपर्यंत कोणतेही अधिकृत वीज कनेक्शन घेतले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ग्रामपंचायतीमध्ये अनधिकृत वीज पुरवठा सुरु आहे. परंतु महावितरणच्या अधिकाऱ्यांना अजूनपर्यंत हे लक्षात आले नाही. महावितरणकडून विजचोरी करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. परंतु आता सरकारी कार्यालय असलेल्या ग्रामपंचायतीने हा प्रकार केला आहे. यामुळे महावितरण कोणाविरुद्ध वीज चोरीचा गुन्हा दाखल करणार? आता हा प्रश्न आहे.

लक्षात कसे आले नाही

तब्बल ६७ वर्ष अनधिकृत कनेक्शन असताना महावितरणच्या अधिकाऱ्यांना लक्षात कसे आले नाही? एखाद्या सरकारी कार्यालयाने अधिकृत कनेक्शन घेऊन रितसर वीज बिल भरू नये, याबद्दलही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ग्रामपंचायतीमध्ये १९५६ पासून किती ग्रामसेवक आली असतील, एकानेही यासंदर्भात नियमाचे पालन केले नाही, असे दिसून येत आहे.