मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर रोज शेकडो वाहनांवर कारवाई, लाखोंचा दंड, तरीही वाहनचालक बेफिकीर

| Updated on: Apr 29, 2023 | 4:22 PM

pune-mumbai highway accident : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर दोन दिवसांपूर्वी विचित्र अपघात झालाय. ११ वाहने एकमेकांना धडकली. या अपघातानंतर उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून धडक कारवाई केली जात आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर रोज शेकडो वाहनांवर कारवाई, लाखोंचा दंड, तरीही वाहनचालक  बेफिकीर
Follow us on

पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर २७ एप्रिल रोजी ११ वाहनांचा विचित्र अपघात झालाय. या अपघातात एक चारचाकी तर अक्षरशः दुसऱ्या वाहनावर उभी आहे. खोपोली एक्झिटजवळ झालेल्या या अपघातानंतर सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. वाहन चालक नियमांचे पालन करत नसल्याचे गेल्या काही दिवसांपासून केलेल्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. अपघात टाळण्यासाठी प्रशासन सतत प्रयत्न केले जात आहे. मागील पाच महिन्यांपासून रोज शेकडो वाहनांवर कारवाई होत आहे. तसेच लाखो रुपयांचा दंडही वसूल केला जात आहे.

काय सुरु आहे कारवाई

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर शिंगरोबा मंदिराच्या मागे असलेल्या दरीत खासगी बस मागील आठवड्यात कोसळली होती. या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ११ वाहनांचा विचित्र अपघात झाला. आठवड्याभरात झालेल्या या दोन अपघातानंतर मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून जोरदार कारवाई केली जात आहे. गेल्या पाच महिन्यात रोज सरासरी 270 वाहनांवर कारवाई होत आहे. या कारवाईच्या माध्यमातून 4.81 लाख रुपये रोज दंड वसूल केला जात आहे. परंतु नियमांचे पालन अनेक वाहनधारक करत नाही.

असे होतात दंड

एक्स्प्रेस वेवर आरटीओकडून ओव्हर स्पीडिंग आणि लाइन कटिंगची कारवाई नियमित केली जात आहे. आरटीओकडून मिळालेल्या माहितीनुसार, डिसेंबर 2022 ते एप्रिल 2023 या कालावधीत 6,983 जणांवर ओव्हर स्पीडिंगसाठी कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून सुमारे 1.40 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दरम्यान, लेन कटिंगसाठी 6,441 जणांकडून 2.57 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. बहुतांश अपघात हे अतिवेग आणि लेन कटिंगसारख्या निष्काळजीपणामुळे होतात. त्यामुळे ही कारवाई होत आहे.

आरटीओने सीट बेल्ट न लावणाऱ्या सुमारे 6,000 वाहनचालकांवर कारवाई केली असून, त्यांच्याकडून 30 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. वाहन चालवताना मोबाईलवर बोलणाऱ्यांवरही कारवाई सुरू करण्यात आली आहे. पाच महिन्यांत गाडी चालवताना बोलल्याप्रकरणी ६५६ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

आयटीएमएस यंत्रणा

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर आयटीएमएस म्हणजेच इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम बसविण्यात येणार आहे. आता परिवहन विभाग, महामार्ग पोलिस व ‘एमएसआरडीसी’ने त्यासाठी हालचाली सुरु केल्याय. यासाठी लवकरच सर्व्हेला सुरुवात होणार आहे.

काय आहे तंत्रज्ञान

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे वर आता वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. वाहनांनी ठरवून दिलेली मार्गिका सोडू नये यासाठी ‘आयटीएमएस’ काम करणार आहे. वाहतुकीची शिस्त पाळणे, अपघात टळाणे, अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळावी यासाठी अत्याधुनिक यंत्रणा बसविणार आहे.