Pune water : आता भरारी पथकं पाहणार कुठे पाणी गळतंय ते! पुणे महापालिका आयुक्तांनी केली नियुक्ती, पाणीसमस्या होतेय तीव्र

| Updated on: Apr 30, 2022 | 5:04 PM

एकीकडे पाणीटंचाईचे संकट शहरात असताना दुसरीकडे कालवा समितीत पुणे महापालिका सर्वाधिक पाणी वापर करीत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तर त्याचवेळी शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करताना महापालिका मेटाकुटीला आली आहे.

Pune water : आता भरारी पथकं पाहणार कुठे पाणी गळतंय ते! पुणे महापालिका आयुक्तांनी केली नियुक्ती, पाणीसमस्या होतेय तीव्र
पुढील आठवड्यात मुंबईतील काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : शहरातील पाणी टंचाई (Water shortage) आणि गळती शोधण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त (PMC commissioner) विक्रमकुमार यांनी या भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. बाणेर-बालेवाडी परिसरात सध्या या पथकांकडून पाणी पुरवठ्याची खातरजमा करण्यात येत आहे. सध्या उन्हामुळे (Summer) शहरातील पाण्याची मागणी वाढली आहे. जवळपास 1600 एमएलडीपर्यंत पाण्याच्या मागणीत वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर हे पथक आता काम करणार आहे. मागणी वाढल्यामुळे सहाजिकत महापालिकेवरचा ताणही वाढला आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने अनेक भागात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. मागील काही दिवसांपासून ही समस्या वाढत असून उग्र रूप धारण करत असल्याचे दिसून येत आहे. आता आयुक्त विक्रमकुमार यांनी नेमलेल्या पथकांमार्फत याचा अभ्यास आणि पाहणी होणार आहे.

‘टेलएंड’ला पाणीपुरवठा तुलनेने कमी

एकीकडे पाणीटंचाईचे संकट शहरात असताना दुसरीकडे कालवा समितीत पुणे महापालिका सर्वाधिक पाणी वापर करीत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तर त्याचवेळी शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करताना महापालिका मेटाकुटीला आली आहे. शहराच्या ‘टेलएंड’ला पाणीपुरवठा तुलनेने कमी होत असल्याने तेथून सर्वाधित तक्रारी महापालिकेला प्राप्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून नेमण्यात आलेली ही पथके पाण्याची गळती शोधण्याच काम सुरू करणार आहे.

टंचाई आणि आंदोलने

शहरातील पाणीटंचाई आणि टँकरमाफियांच्या विरोधात विविध संघटना मागच्या महिनाभरापासून आक्रमक झाल्या आहेत. चार दिवसांपूर्वीच आम आदमी पार्टीने आक्रमक भूमिका घेत बालगंधर्व रंगमंदिर चौकात आंदोलन केले होते. तर राष्ट्रवादीने दत्तनगर, भारतनगर, महादेव नगर या भागातील पाणीटंचाईच्या प्रश्नी आंदोलन करत हंडा मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. शहराच्या विविध भागांत सध्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.

रस्त्यांचीही सुरू आहेत कामे

शहराच्या अनेक भागात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामामुळे अनेक रहिवाशांना पाणीकपात किंवा कमी दाबाने पाणी मिळत आहे. दुरुस्तीचे काम असेल तरच पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो, असे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. आता कधी पाणीगळती, तर कधी रस्त्याची कामे किंवा आणखी काही… मात्र पुणेकर पाणीटंचाईने हैराण झाले आहेत. त्यावर उपाय काढण्याची मागणी होत आहे.