Maharashtra Rain: काम असेल तरच घराबाहेर पडा, राज्यात अती मुसळधार पावसाचा इशारा, सहा जिल्ह्यांना रेड अलर्ट

| Updated on: Jul 19, 2024 | 8:05 AM

weather updates: राज्यात वादळी वाऱ्यासह अती मुसळधार पावसाची शक्यता पुणे हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तसेच राज्यातील सहा जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. रत्नागिरी, सातारा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे.

Maharashtra Rain: काम असेल तरच घराबाहेर पडा, राज्यात अती मुसळधार पावसाचा इशारा, सहा जिल्ह्यांना रेड अलर्ट
राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
Follow us on

राज्यात सर्वत्र मान्सूनने जोर धरला आहे. मुंबई आणि कोकणात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. आता राज्यात वादळी वाऱ्यासह अती मुसळधार पावसाची शक्यता पुणे हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तसेच राज्यातील सहा जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. रत्नागिरी, सातारा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे. रायगड, कोल्हापूर आणि दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईत शुक्रवारी सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. उत्तर बंगालच्या उपसागरावर कमी दाबाची पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे 19-21 जुलै दरम्यान कोकण,पश्चिम किनारपट्टीवर काही ठिकाणी मुसळधार-अति मुसळधार पाऊस पडणार आहे.

मुंबईत संततधार पाऊस, पुण्यातही अलर्ट

गुरुवारपासून मुंबईत संततधार पाऊस सुरू आहे. त्यानंतर शुक्रवारी पहाटेपासून मुंबईतील काही भागात मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईच्या मरबार हिल परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबई, पुणे, ठाणे या भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसेच विदर्भातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.

हे सुद्धा वाचा

लोणावळ्यात मुसळधार पाऊस

लोणावळ्यात गुरुवारी 148 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. लोणावळ्यात रविवारी आणि शनिवारी या दोन दिवस जोरदार पाऊस झाला होता. त्यानंतर गेली चार दिवस पावसाने दडी मारली होती. त्यानंतर आता गुरुवारी दिवसभर मुसळधार पावसाने चांगली हजेरी लावली.

रत्नागिरीत जोरदार वारे

रत्नागिरी जिल्ह्यात गुरुवारी रात्री पावसाचा जोर वाढला. किनारपट्टी भागात वेगवान वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरु आहे. शुक्रवारी पहाटेनंतर पावसाचे विश्रांती घेतली आहे. परंतु दक्षिण रत्नागिरीत पावसाच्या जोरदार सरी सुरु आहे. किनारपट्टी भागात ताशी 40 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहे. शुक्रवारी रत्नागिरी जिल्ह्यासाठी पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.

धुळ्यात मुसळधार पाऊस

गेल्या दोन दिवसांपासून शिंदखेडा तालुक्याला पावसाने झोडपून काढले आहे. दोन दिवसांपूर्वी तालुक्यात ढग सदृश्य परिस्थिती झाली होती. त्यामुळे मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर नदी नालेले वाहू लागले होते तर आता पुन्हा एकदा शिंदखेडा तालुक्यातील होळ आणि धांदरने गावांमध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे सूर नदीला पूर आला. त्यामुळे नदीला बाजूला असलेल्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी घुसल्याने शेतातील कपाशी मका पिक पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा नुकसान झाले आहे.