अतिवृष्टीचा फटका… आजपासून रायगड किल्ला पर्यटकांसाठी बंद; किल्ल्याला पोलिसांचा 24 तास वेढा

| Updated on: Jul 08, 2024 | 3:44 PM

पावसाळ्यात धोकादायक परिस्थिती निर्माण होण्याच्या शक्यतेमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पुढील काही महिने रायगड किल्ला हा पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

अतिवृष्टीचा फटका... आजपासून रायगड किल्ला पर्यटकांसाठी बंद; किल्ल्याला पोलिसांचा 24 तास वेढा
रायगड किल्ला बंद
Follow us on

Raigad Fort Closed : मुंबईसह कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबईत झालेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. या पार्श्वभूमीवर आजपासून रायगड किल्ला पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

सध्या सोशल मीडियावर रायगड किल्ल्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत रायगड किल्ल्यावर ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामुळे अनेक पर्यटक रायगड किल्ल्यावर अडकल्याचे पाहायला मिळाली. याच पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने रायगड किल्ला पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

रोपवेचा मार्ग देखील बंद

रायगड किल्ल्याचा मुख्य दरवाजासोबतच नाने दरवाजा आणि रोपवेचा मार्ग देखील बंद केलेला आहे. त्यामुळे पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना माघारी जावे लागले. रायगड किल्ल्यावर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. रायगड किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोलीस देखील तैनात करण्यात आले आहेत. रायगड किल्ल्यावर पायी जाणारा चित्त दरवाजा आणि नाणे दरवाजा मार्ग बॅरीकेटिंग करून बंद करण्यात आला आहे. या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्तही पाहायला मिळत आहे.

तसेच सद्यस्थितीत किल्ले रायगडावर असलेल्या पर्यटकांना रोपवेने गडावरुन खाली नेण्यात येत आहे. प्रशासनाकडून किल्ल्यावर जाण्यासाठी असेलला रोपवे बंद करण्यात आला आहे. त्यासोबतच किल्ले रायगडावर जाणाऱ्या सर्वच वाटा बंद करण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी हा निर्णय घेतला.

रायगड किल्ल्याजवळ पोलीस २४ तास बंदोबस्त ठेवणार आहेत. पावसाळ्यात धोकादायक परिस्थिती निर्माण होण्याच्या शक्यतेमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पुढील काही महिने रायगड किल्ला हा पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

हवामान खात्याचा इशारा

हवामान विभागाने दिलेल्या अलर्टनुसार पुढचे पाच दिवस दिवस कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, कर्नाटक, मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्रात ९ ते ११ जुलै दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे. ८ जुलै रोजी मध्य महाराष्ट्रातील घाट भागात अतिवृष्टीचा अंदाज विभागाने वर्तवला आहे.