किल्ले रायगडाच्या पायऱ्यांना धबधब्याचं रुप; पहा धडकी भरवणारा VIDEO

| Updated on: Jul 08, 2024 | 12:10 PM

राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये शनिवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस आहे. रायगडात ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण झाली असून किल्ले रायगडाच्या पायऱ्यांवरून धबाधब्यासारखं पाणी वाहत आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

किल्ले रायगडाच्या पायऱ्यांना धबधब्याचं रुप; पहा धडकी भरवणारा VIDEO
Raigad Fort
Follow us on

गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडतोय. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. किल्ले रायगडावर ढगफुटी सदृश पाऊस सुरू असून धडकी भरवणारे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. धो-धो पडणारा पाऊस आणि ढगफुटी सदृश परिस्थिती यांमुळे किल्ले रायगडाच्या पायऱ्यांना धबधब्याचं स्वरुप प्राप्त झालं आहे. व्हायरल व्हिडीओंमध्ये किल्ल्याच्या पायऱ्यांवरून अक्राळविक्राळपणे पाणी वाहताना दिसतंय. त्यात काही पर्यटकसुद्धा अडकल्याचं दिसून येत आहे. बुरूज आणि कड्यांवरूनही धबधब्यासारखं पाणी वाहतंय. पर्यटक आणि शिवप्रेमी हे तारेवरची कसरत करत त्या वाहत्या पाण्यातून खाली उतरण्याचा प्रयत्न करत आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर किल्ले रायगडावर जाणाऱ्या वाटा बंद केल्या आहेत. जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.

गडावर चालत जाणाऱ्या मार्गावर बॅरीकेट्स लावण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे तिथे पोलिसांचा 24 तास बंदोबस्त राहणार आहे. गडावरील रोपवेची सेवाही बंद करण्यात आली आहे. आजपासून (8 जुलै) रायगड किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. किल्ल्यावर पायी जाणाऱ्या चित्त दरवाजा आणि नाणे दरवाजा मार्गावर बॅरीकेटिंग करण्यात आली आहे.

रागयड जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. जिल्ह्यात सरासरी 77 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर माथेरान इथं सर्वाधिक 220 मिलीमीटर पाऊस पडला आहे. हवामान विभागाने आज अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने आठवडाभराच्या विश्रांतीनंतर चांगलंच झोडपून काढलं आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह संततधार पडणाऱ्या पावसामुळे राजापूर, लांजा, रत्नागिरी, चिपळूण, खेड आणि तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाणादाण उडाली आहे. या हंगामातील पहिल्यात अतिवृष्टीमुळे नदीनाल्यांना महापूर आला आहे. जिल्हा मुख्यालय ओरोस, बांदा शहरात पाणी घुसलंय. तर सावंतवाडी शहरातील बाजारपेठ जयप्रकाश चौक रस्त्यावर पाणी आल्याने दुकानदारांची पळापळ सुरू झाली.