मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांच्या आंदोलनामागे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते असल्याचा आरोप अनेक वेळा होत आहे. परंतु आता अंतरवली सराटीत झालेल्या आंदोलनाबाबत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते अन् मंत्री छगन भुजबळ यांनी राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून देणारा दावा केला आहे. अंतरवली सराटीमध्ये २ सप्टेंबर २०२३ रोजी पोलिसांकडून लाठीहल्ला झाला होता. त्यानंतर मनोज जरांगे निघून गेले होते, परंतु शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार रोहित पवार आणि राजेश टोपे यांनी त्यांना पुन्हा आणून बसवले, असा दावा भुजबळ यांनी केला आहे. या लोकांनी पवार साहेबांना तिथे बोलावले. मग पवार साहेब गेले म्हणून उद्धव ठाकरे गेले. खरी माहिती जी आहे. त्याची त्या दोघांना कल्पना नव्हती, असे भुजबळ यांनी म्हटले आहे.
भुजबळांनी यांनी केलेल्या आरोपानंतर विविध प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. मनोज जरांगे यांना याबद्दल विचारले असता ते म्हणाले, भुजबळ हे चमत्कारीत बाबा आहेत. भुजबळांनी दंगली घडवून आणू नये. म्हतारपणात जी मस्ती आली आहे? ती येऊ देऊ नको. दंगलीचे पाप येऊ देऊ नका. तुम्ही तुमच्या वयाचा विचार करा. ओबीसी-मराठ्यात वाद लावू नको.
कोण कुठे गेला होतो अन् कोणी कोणाला बसवले, त्याची चौकशी फडणवीस करतीलच, असे मनोज जरांगे यांनी म्हटले. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही यासंदर्भात विचारणा केली असता ते म्हणाले, भुजबळ साहेबांनी त्यांचे अनुभव कथन केले असतील. पण आम्ही मराठा समाजाला 10% आरक्षण दिले आहे. महायुती सरकार हे देण्याचे काम करत आहेत, असे त्यांनी म्हटले.
एक्झीट पोलसंदर्भात बोलताना छगन भुजबळ यांनी म्हटले की, मागच्या लोकसभेचा निकाल पाहून हा निकाल असाच येईल, असे नाही. मी अनेक वेळा पाहिले आहे की लोकसभेचा वेगळा निकाल असतो. विधानसभेचा निकाल वेगळा असतो. महापालिकेचा आणखीन वेगळा निकाल येतो. लोकसभेच्या वेळी वेगळे प्रश्न होते. तेव्हा फेक निरेटिव्ह सेट केले गेले. संविधान बदलणार असल्याचे म्हटले गेले. त्याचा परिणाम झाला. परंतु आता महायुतीचा सरकारने लाडकी बहीण योजना आणली आहे. शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. विद्यार्थ्यांना स्टायपेंड दिले जात आहे. मुलींना मोफत शिक्षण आहे. तीन सिलेंडर मोफत आहे. या सगळ्या योजनांचा परिणाम म्हणून महायुती आघाडीपेक्षा पुढे जाणार आहे. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार आहे.