‘सर्व आंबेडकरी नेत्यांनी एकत्र या’, आठवलेंची आंबेडकरांना साद, भाजपकडे केली मोठी मागणी

| Updated on: Oct 11, 2024 | 3:30 PM

विधानसभा निवडणूक तोंडावर असताना रामदास आठवले यांनी सर्व आंबेडकरी नेत्यांना एकत्र येण्याची साद घातली आहे. तसेच रामदास आठवले यांनी भाजपकडेदेखील मोठी मागणी केली आहे. त्यांच्या आवाहनाला आता दोन्ही बाजूने कसा प्रतिसाद मिळतो? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सर्व आंबेडकरी नेत्यांनी एकत्र या, आठवलेंची आंबेडकरांना साद, भाजपकडे केली मोठी मागणी
Follow us on

विधानसभा निवडणुकीची आता कधीही घोषणा होऊ शकते. या निवडणुकीच्या आधी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. कारण केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यासह सर्व आंबेडकरी नेत्यांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. तसेच रामदास आठवले यांनी भाजपकडे आगामी विधानसभा निवडणुतीसाठी 8 ते 10 जागांची मागणी केली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे. रामदास आठवले यांच्या आवाहनाला प्रकाश आंबेडकर प्रतिसाद देतात का? ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच महायुतीत जागावाटपावरुन रस्सीखेच सुरु असताना भाजप रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षासाठी जागा सोडणार का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

“रिपब्लिकन पक्ष देशभर वाढविण्याचा माझा प्रयत्न आहे. फक्त रिपब्लिकनच्या भरवशावर आपण निवडून येऊ शकत नाही. बाबासाहेबांचा दोन वेळा पराभव झाला होता. त्यासाठी पक्ष वाढविण्याचा विचार बाबासाहेबांनी व्यक्त केला होता. आमच्या रिपब्लिकन पक्षात मोठ्या प्रमाणात गटबाजी मुरलेली आहे. एकेकाळी 9 खासदार होते. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि इतर नेते माझ्यासोबत आले असते तर जास्त मंत्री रिपब्लिकनचे असते. मी एकटाच मंत्री झालो. पण एकमत होत नाही. त्यामुळे नुकसान होते. माझी इच्छा आहे सगळे रिब्लिकन एकत्रित यावे”, असं आवाहन रामदास आठवले यांनी केलं आहे. तसेच “प्रकाश आंबेडकर यांनी वंचितच्या माध्यमातून निवडणूक लढवली, पण त्यांचे उमेदवार निवडून आले नाहीत. त्यांना मान्यता मिळाली नाही”, असं मत प्रकाश आंबेडकर यांनी मांडलं.

‘माझ्या पक्षाला 8 ते 10 जागा मागितल्या’

“मी महायुतीत आहे. माझ्या पक्षाला जागा मागितली आहे. 8 ते 10 जागा मागितल्या. एक-दोन कमी होतील. पण त्या द्यायला पाहिजेत. लोकल बॉडीमध्ये इतर सिम्बॉल चालते. पण विधानसभा आणि लोकसभेत आपल्या चिन्हावर लढणं गरजेचं आहे. या निवडणुकीत मिनिमम जागा तरी द्याव्या. तिघांच्या कोट्यातील 3 – 3 जागा जरी मिळाल्या तरी चालेल”, अशी भूमिका रामदास आठवले यांनी मांडली आहे.

‘देवेंद्र फडणवीस 5 जागा देऊ म्हणाले होते’

“उत्तर नागपूर, यवतमाळमधील उमरखेड आणि विदर्भात आणखी दोन आणि इतर महाराष्टाची जागा आम्हा देण्यात यावा, ही आमची अपेक्षा आहे. आम्ही 20 जागांचा प्रस्ताव दिला. पण 8 ते 9 जागा आम्हाला द्याव्या. याचा निर्णय घ्यावा. तीन पक्ष आपसात जागा ठरवत आहेत. आम्ही वाट पाहतो आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 5 जागा देऊ म्हणाले होते. भाजपचा जिथे सिटिंग आमदार नाही त्याठिकाणी आम्हाला उमेदवारी द्यावी”, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.

‘आमचा पक्ष छोटा, पण…’

“मागच्या वेळी भाजप थासजार अनिल बोंडे यांचा आम्ही वर्धा इथून विचार केला होता. त्यांच्यासोबत चर्चा झाली होती. मात्र ते झालं नाही. त्यांच्या जागा जिंकून आल्या. त्यात आमची मत आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये संघर्ष राहणार आहे. मात्र हरियाणामुळे आमचा कॉन्फिडन्स वाढला आहे. लाडकी बहीण सारख्या अनेक योजना सरकारने आणल्या. त्याचा फायदा होईल. आमचे कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात जात नाहीत. मात्र त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आमचा पक्ष छोटा आहे. पण महत्वाचा आहे. त्यांनी मोठ्या पक्षांना मान द्यावा. पण सोबत आम्हाला पण मान द्यावा. आम्हाला जागा मिळणार नाही असं होणार नाही. पण कमी मिळाल्या तर आम्हाला ते सामावून घेतील इतर ठिकाणी स्थान देतील. आम्ही महायुती पासून दूर जाणार नाही”, असंही रामदास आठवले यांनी स्पष्ट केलं.

रामदास आठवले यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. “मी इथे असल्यामुळे मनसे इथे येणार नाही. राज ठाकरे यांच्या सभा मोठ्या होतात. मात्र मत त्यांना मिळत नाही. सुरवातीला त्यांना 13 आमदार मिळाले. पण नंतर त्यांना आमदार मिळाले नाही. ते स्वतंत्र लढणार आहेत. आता अनेक आघाड्या झाल्या आहेत”, असं रामदास आठवले म्हणाले.