‘आमच असूनही देऊ नका म्हणत असाल, तर मग…’, काय म्हणाले मनोज जरांगे पाटील? Video

| Updated on: Nov 08, 2023 | 10:51 AM

Manoj jarange patil | मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मुद्यावरुन राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असं चित्र निर्माण होतय. ओबीसी नेते आता एकवटले असून त्यांनी दिवाळीनंतर ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल असं म्हटलं आहे. सध्या मराठा आरक्षण आंदोलनाचा चेहरा बनलेले मनोज जरांगे पाटील यांनी मराठा विरुद्ध ओबीसी हे चित्र निर्माण करण्याचा जो प्रयत्न होतोय, त्यावर आपलं मत मांडलय.

आमच असूनही देऊ नका म्हणत असाल, तर मग..., काय म्हणाले मनोज जरांगे पाटील? Video
andolak Manoj Jarange Patil
Follow us on

छत्रपती संभाजी नगर (दत्ता कनवटे) : “माझी तब्येत ठणठणीत होत आहे. मी दोन-तीन दिवसात प्रॅक्टिकल काम सुरु करतोय. त्यांचही काम सुरु आहे. सरकारकडून त्यांच्या पातळीवर प्रचंड जोरात काम सुरु आहे. मराठा समाजाला 29 ऑगस्टला शहागडला शब्द दिला होता. त्यानुसार, मराठ्यांच्या पदरात प्रमाणपत्र पडतायत. सरकार काम करतय. नाराजी व्यक्त करायची त्यावेळी केली. आज सरकार संपूर्ण ताकदीने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी, कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी काम करतय. जिल्ह्या-जिल्ह्यात मराठा समाजाला प्रमाणपत्र देण्यासाठी कक्ष स्थापन केलेत. ते दिरंगाई नाही करतयत. त्यांनी दिरंगाई केली, तर आम्ही आम्ही सावध आहेत” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. त्यांनी रुग्णालयातून माध्यमांशी संवाद साधला.

ओबीसी नेते उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांना भेटले, त्यावेळी कुणाच्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. पण बाहेर आल्यावर ओबीसी धोक्यात आहे, असं म्हटलं गेलं. त्या संबंधी विचारलेल्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “ते एकटवले, नाही एकटवले हा भाग वेगळा. नेते एकवटतायत. सामान्य ओबीसी बांधवांना माहितीय की, पुरावे सापडत असतील, तर मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे” “आरक्षण आम्ही त्यांचं हिसकावून घेत नाहीय, आमचं आरक्षण तिथे आहे, ते आम्ही घेतोय. सत्य असल्यामुळे सरकार आम्हाला ते देतय” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “आमच्याकडे कुणबी असल्याच्या नोंदी आहेत, म्हणून सरकार आरक्षण देतय. हे गावा-गावातील ओबीसी बांधवांना पटू लागलय” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

‘….तर गाव पातळीवर ओबीसींनी विरोध केला असता’

“आमच्याकडे काही पुरावे नाहीत, आम्ही ओबीसीत गेलो असं नाहीय. आमचे पुरावे आहेत म्हणून कुणबी प्रमाणपत्र मिळतय. आमच्याकडे पुरावे नसते, तर गाव पातळीवर ओबीसींनी विरोध केला असता” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “ग्रामीण भागातील ओबीसी बांधव त्यांच्याच नेत्याला नाव ठेवतायत. तुम्ही मराठा समाजाला विरोध करुन मराठा आणि ओबीसीमध्ये भांडण लावण्याचा काम करताय, असं सर्वसामान्य ओबीसींच म्हणणं आहे” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

मराठ्यांना आरक्षण मिळू नये हे कोणाच्या मनात?

ओबीसी समाजाचे मोर्चे निघणार आहेत, त्यावर चांगली गोष्ट आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “ओबीसी बांधवांनी एक गोष्ट समजून घ्यावी, आमच्याकडे पुरावे आहेत. ग्रामीण भागात एखाद्याची जमीन असेल, त्याचा रेकॉर्ड असेल, तर त्याला ते मिळालं पाहिजे. आमच असूनही देऊ नका म्हणत असाल, तर मग गोरगरीब, मराठ्याच्या लेकरावर का कोपताय? मराठ्यांना आरक्षण मिळू नये हे ओबीसी नेत्यांच्या मनात आहे. मागच्या 30-40 वर्षांपासून ओबीसी नेत्यांचा सरकारवर दबाव होता. म्हणून पुरावे असूनही आरक्षण मिळत नव्हतं” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.