मोठी बातमी | संजय राऊत यांचं देवेंद्र फडणवीस यांना पत्र, भाजप आमदार राहुल कुल यांच्यावर 500 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप, काय आहे प्रकरण?

| Updated on: Mar 13, 2023 | 8:51 AM

Sanjay Raut News | संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आणखी एक पत्र लिहिलंय. भाजप आमदार राहुल कुल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारं हे पत्र आहे.

मोठी बातमी | संजय राऊत यांचं देवेंद्र फडणवीस यांना पत्र, भाजप आमदार राहुल कुल यांच्यावर 500 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप, काय आहे प्रकरण?
Image Credit source: social media
Follow us on

दिनेश दुखंडे, मुंबई | हसन मुश्रीफ (Hasan Mushrif), सदानंद कदम (Sadanand kadam) यांच्याविरोधातील कारवाईमुळे राज्यातील राजकारणात खळबळ माजली असतानाच आता संजय राऊत यांनी आणखी एक प्रकरण समोर आणलं आहे. भाजप आमदार राहुल कुल यांनी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. भाजप आमदार राहुल कुल यांच्या भीमा सहकारी साखर कारखान्यात तब्बल ५०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राऊत यांनी केलाय. भीमा सहकारी साखर कारखाना हा पुणे जिल्ह्यातील दौंड येथे आहे. राऊत यांनी यासंदर्भात फडणवीस यांना भलं मोठं पत्र लिहिलंय. हा भ्रष्टाचार नेमका कसा झाला, याचा घटनाक्रमही त्यांनी पत्रात लिहिलाय. हे पत्र त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलं असून ते आता भाजप नेत्यांची यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

काय आहेत नेमके आरोप?

पुण्यातील दौंड येथील भीमा सहकारी साखर कारखान्याने गेल्या काही वर्षात तब्बल ५०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप राऊत यांनी केलाय. ‘कारखान्यात ५०० कोटी रुपयांचे मनी लाँडरींग झाले आहे. कोल्हापुरातील आमदार हसन मुश्रीफ यांच्या सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे प्रकरण सध्या चर्चेत आहे. तपास यंत्रणांच्या धाडी पडत आहेत. पण दौंडच्या भीमा सहकारी साखर कारखान्यातील शेकडो कोटींच्या गैरव्यवहार त्यापेक्षाही भयंकर आहे. या भ्रष्टाचाराला राजकीय संरक्षण मिळत असेल तर ते गंभीर आहे, असा इशारा या पत्रातून देण्यात आलाय.

‘किरीट सोमय्या का मूग गिळून बसलेत?’

विरोधी पक्षांतील नेत्यांच्या भ्रष्टाचारावर बोलणारे किरीट सोमय्या भाजपातील भ्रष्टाचाराविरोधात का मूग गिळून बसलेत, असा सवाल संजय राऊत यांनी केलाय. जनतेच्या पैशांची प्रचंड लूटमार या कारखान्यात झाली आहे. हे प्रकरण तत्काळ ईडी व सीबीआयच्या ताब्यात देऊन भीमा सहकारी साखर कारखान्यात घोटाळा करणाऱ्यांवर कारवाई करावी, या अशी मागणी राऊत यांनी केली आहे.

कोण आहेत राहुल कुल?

राहुल कुल हे पुणे जिल्ह्यातील दौंड विधानसभा मतदार संघातील आमदार आहेत. २०१९ मध्ये ते भाजपच्या तिकिटावर विधानसभा निवडणुकीत विजयी झाले. तत्पूर्वी ते राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार होते. संजय राऊत यांनी राहुल कुल यांच्याशी संबंधित साखर कारखान्यावरून भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. यामागेही मोठं कारण असल्याचं म्हटलं जातंय. संजय राऊत यांच्याविरोधात सुरु असलेल्या हक्कभंग कारवाईच्या प्रक्रियेत जी समिती नेमण्यात आली आहे, त्या समितीचे अध्यक्ष राहुल कुल आहेत. विधिमंडळाला चोरमंडळ असे संबोधल्या प्रकरणी संजय राऊत यांना हक्कभंग कारवाईची नोटीस देण्यात आली आहे. या हक्कभंग समितीचे अध्यक्ष राहुल कुल आहेत. त्यामुळेच राऊत यांनी हे गंभीर आरोप केल्याची चर्चा आहे.