शरद पवार यांचं महाराष्ट्र बंद मागे घेण्याचं आवाहन, संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….

| Updated on: Aug 23, 2024 | 6:32 PM

शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना महाराष्ट्र बंद मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात? याकडे राज्याचं लक्ष आहे. उद्धव ठाकरे आता पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार आहेत. त्याआधी संजय राऊतांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

शरद पवार यांचं महाराष्ट्र बंद मागे घेण्याचं आवाहन, संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
संजय राऊत आणि शरद पवार
Follow us on

माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्त उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील नागरिकांना उद्या दुपारी दोन वाजेपर्यंत बंद पाळण्याचं आवाहन केलं आहे. पण त्यांच्या या आवाहनाच्या विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवर तातडीने सुनावणी पार पडली. यावेळी मुंबई हायकोर्टाने हा बंद बेकायदेशीर असल्याचं ठरवलं. कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही. जर तसा कुणी प्रयत्न केला तर कायदेशीर कारवाई करा, असे निर्देश मुंबई हायकोर्टाने सरकारला दिले आहेत. कोर्टाच्या आदेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना बंद मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. शरद पवारांनी ट्विट करत भूमिका मांडली आहे. त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली.

“हा बंद महाराष्ट्रातील महिला अत्याचार, मुलींवरचे अत्याचार होत आहेत, सरकारची निष्क्रियता यावर आंदोलन आहे. न्यायालय आंदोलनाला कसं बेकायदेशीर ठरवू शकतं? हे न्यायालयात ब्रिटिश काळात असतं तर आमचं चले जाओची चळवळ बेकायदेशीर ठरवलं असतं. स्वातंत्र्य संग्राम बेकायदेशीर ठरवलं असतं. या देशात जुलूमशाही, हुकूमशाही सुरु आहे. न्यायालयाने राज्य घटनेचा आदर करुन लोक आंदोलनाला असं चिरडता कामा नये ही आमची स्पष्ट भूमिका आहे”, असं संजय राऊत म्हणाले.

‘फडणवीसांनी एक याचिकाकर्ता पाळून ठेवलाय’

“लोकशाहीत प्रत्येक व्यक्तीला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. संविधानाने दिलेला अधिकार आहे. ही दडपशाही कुणालाच करता येत नाही. कुणीतरी सोम्या, गोम्या याचिकाकर्ता, त्याला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कोर्टात पाठवतात, तो नेहमीचा आहे, तो मराठ्यांच्याविरोधात जातो, ओबीसींविरोधात कोर्टात जातो, बंदच्या विरोधात तो जातो, देवेंद्र फडणवीसांनी एक याचिकाकर्ता पाळून ठेवलेला आहे, तो न्यायालयात जातो आणि न्यायालय निर्णय देतं”, अशी खोचक टीका संजय राऊतांनी केली.

हे सुद्धा वाचा

‘जनतेचं आंदोलन चिरडण्यासाठी याचिका’

“सरकार बेकायदेशीर आहे. त्यावर कुणी निर्णय देत नाही. सरकार राज्य घटनेच्या विरोधात काम करतंय, त्यावर कोर्ट निर्णय देत नाही. बेकायदेशीर सरकार कोर्टात जातं आणि जनतेचं आंदोलन चिरडण्यासाठी याचिका दाखल करतं, त्यावर तात्काळ निर्णय दिला जातो”, असं संजय राऊत म्हणाले.

‘महाराष्ट्रातील लेकी-सूनांच्या संरक्षणासाठी बंद’

यावेळी संजय राऊतांना शरद पवार यानी बंद मागे घेण्याचं आवाहन केल्याबाबत विचारण्यात आलं. त्यावर राऊतांनी प्रतिक्रिया दिली. “ठिक आहे, हे जनता ठरवेल. हा बंद उत्सफूर्त आहे. जनतेचा भावना पाहून आम्ही त्या बंदला पाठिंबा दिला. आता जनतेने ठरवायचं आहे. हा बंद कुणाच्या खाजगी कामांसाठी बंद नाही. महाराष्ट्रातील लेकी-सूनांच्या संरक्षणासाठी बंद आहे”, असं संजय राऊत म्हणाले.

काँग्रेसनेही पाठ फिरवली

मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर काँग्रेसनेदेखील उद्धव ठाकरे यांना पाठ दाखवली आहे. काँग्रेसनेदेखील कोर्टाच्या आदेशाचा मान ठेवू, असं म्हणत बंद मागे घेत असल्याचं जाहीर केलं आहे. उद्या काळ्या फित्या बांधून शांततेत आंदोलन करु, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले आहेत. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष आहे.