“कोणत्याही धर्माविषयी..”; धारावी मशिदप्रकरणी नितेश राणेंच्या वक्तव्याला महायुतीतल्याच बड्या नेत्याचा विरोध

| Updated on: Sep 22, 2024 | 9:49 AM

धारावीच्या 90 फीट रोडवरील मशिदीत अनधिकृत बांधकाम झाल्याचा आरोप आहे. शनिवारी सकाळी मुंबई महापालिकेचं पथक हे अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी धारावीत पोहोचलं होतं. त्यावेळी मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले होते.

कोणत्याही धर्माविषयी..; धारावी मशिदप्रकरणी नितेश राणेंच्या वक्तव्याला महायुतीतल्याच बड्या नेत्याचा विरोध
नितेश राणे
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

धारावीत शनिवारी मशिदीचं अनधिकृत बांधकाम तोडण्यावरून मोठा तणाव निर्माण झाला होता. हा विषय तापल्यानंतर त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचा खेळ सुरू झाला. त्यातच भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रक्षोभक वक्तव्य केलं होतं. “मी वारंवार बोलतोय. या जिहादी मानसिकतेच्या लोकांना आमच्या देशात, महाराष्ट्रात शरीया कायदा लागू करायचा आहे” असा आरोप त्यांनी केला होता. राणेंच्या या वक्तव्यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते शहाजी बापू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “कोणत्याही धर्माविषयी लोकांच्या भावना भडकतील असं वक्तव्य कोणीही करू नये. मी सर्व जाती धर्माशी प्रेमाने बोलतो, प्रेमाने वागतो. असं भडक वक्तव्य मला मान्य नाही. त्याचप्रमाणे राणेंना सल्ला देण्याएवढा मी मोठा नाही”, असं ते म्हणाले.

यावेळी ते मुख्यमंत्रीपदाबद्दलही मोकळेपणे व्यक्त झाले. “उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाची दिवा स्वप्नं पाहत आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील अशी राजकीय परिस्थिती कधीच निर्माण होणार नाही. ही परिस्थिती तेव्हाच होती, जेव्हा शिवसेना-भाजप एकत्र होते. शिवसेना-भाजप एकत्र असताना उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद स्वीकारायला पाहिजे होतं. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटतं की आपला नेता मुख्यमंत्री व्हावा. परंतु जनतेच्या मनात जो आहे तोच मुख्यमंत्री होत असतो आणि जनतेच्या मनात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत आणि तेच भावी मुख्यमंत्री होतील,” असा विश्वास शहाजी बापू पाटील यांनी व्यक्त केला. महायुतीत शिवसेनेला किती जागा मिळतील हे सांगता येणार नाही. परंतु सगळ्यात जास्त रन रेट हा शिवसेनेचाच असणार, असंही ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

तिसऱ्या आघाडीबद्दलही बोलताना ते पुढे म्हणाले, “राज्यात तिसऱ्या आघाडीचे यापूर्वी अनेक प्रयोग झाले आहेत. मात्र तिसरी आघाडी ही तिसरीच राहत असते. महायुती आणि महाविकास आघाडीवर तिसऱ्या आघाडीचा कोणताच परिणाम होणार नाही. भारतीय जनता पार्टीच्या खांद्याला खांदा लावून निवडणूक लढवून आम्ही बहुमत प्राप्त केलं. मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून शरद पवारांच्या मांडीवर जाऊन बसलात, त्याचं उत्तर पहिल्यांदा द्या. मग आमची गद्दारी आहे का नाही याचा अभ्यास करा. ही गद्दारी नाही. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळवून देण्याचं काम आम्ही केलं. त्यामुळे सांगोला तालुका सुजलाम सुफलाम झाला.”