नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यातील संबंध बिघडले? पवारांचं पहिल्यांदाच सर्वात मोठं विधान काय?

| Updated on: Jun 11, 2024 | 10:05 PM

"मुस्लिम समाजातील लोकांवर त्यांनी वक्तव्य केले. त्यांनी मुस्लिम नाव घेतले नाही. त्यांनी मंगळसूत्रचा विषय काढला. हा निवडणूकीचा विषय आहे का?", असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवारांनी केला.

नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यातील संबंध बिघडले? पवारांचं पहिल्यांदाच सर्वात मोठं विधान काय?
शरद पवार यांचा मोदींवर हल्लाबोल
Follow us on

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत असलेल्या आपल्या नात्याबाबत भाष्य केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आपले चांगले संबंध होते. पण हे संबंध आता ताणले गेले आहेत. मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी प्रचारादरम्यान शरद पवार यांच्यावर टीका करताना भटकी आत्मा असा उल्लेख केला होता. याच टीकेवरुन शरद पवार यांनी कालदेखील नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. यानंतर शरद पवार यांनी आज नरेंद्र मोदी यांच्याबद्दल महत्त्वाचं वक्तव्य केलं.

“नेतृत्व करणाऱ्या लोकांनी या निवडणुकीत मर्यादा सोडल्या. मोदी इथे आले. त्यांनी सांगितले की, मी बोट धरून शिकलो. मोदींना अमेरिकेने व्हिसा नाकारला. मी कृषीमंत्री असताना मला इस्त्रायलला त्यांना नेले. त्यानंतर ते प्रधानमंत्री झाले. त्यांचे माझे चांगले संबंध होते. पण कालांतराने त्यांनी मर्यादा सोडल्या”, असं शरद पवार म्हणाले. “मुस्लिम समाजातील लोकांवर त्यांनी वक्तव्य केले. त्यांनी मुस्लिम नाव घेतले नाही. त्यांनी मंगळसूत्रचा विषय काढला. हा निवडणूकीचा विषय आहे का?”, असा सवाल शरद पवारांनी केला.

“दोन पैकी एक म्हैस घेऊन जातील असे सांगितले. सत्तेत असताना असे सांगतात का? पदाची प्रतिष्ठा आपण किती ठेवतो? प्रधानमंत्री एक इन्स्टिट्यूशन आहे. भाजपच्या 60 जागा कमी आल्या. मंदिर बांधले. त्याचा आंनद. पण मंदिराच्या नावाखाली जो धार्मिक अंतर वाढवण्याचा प्रयत्न केला गेला त्याने अयोध्यामध्ये भाजपचा उमेदवार पडला”, असं शरद पवार म्हणाले.

‘ही लोकशाहीची ताकद आहे’

“77 मध्ये आणीबाणी जाहीर केली. त्यावेळी लोकं निवडणुकीला उभे राहायला नव्हते. इंदिरा गांधींचे नाव होते. तरीही त्यांचा पराभव झाला. इंदिरा गांधी चुकीच्या रस्त्याने गेल्या म्हणून त्यांचा पराभव केला. जनता पक्ष नीट चालवता आला नाही म्हणून जनात पक्षाला पराभूत केले. ही लोकशाहीची ताकद आहे”, असं शरद पवार म्हणाले.

“मोदींचे एक हाती सरकार होते. पण आता त्यांना सत्ता स्थापन करण्यासाठी मदत घ्यावी लागली. आम्ही जर नीट चाललो नाही तर आम्हला आमची जागा दाखवण्याची ताकद शेवटच्या माणसात आहे. निवडणूक आयोगाने माझा पक्ष आणि चिन्ह काढून घेतले. मला कोर्टात जावे लागले. कोर्टाने मला चिन्ह आणि पक्षाचे नाव निवडण्याची मुभा दिली. त्यामध्ये मला जे आज यश आपल्याला मिळाले त्यापाठीमागे न्यायालय आहे”, असं शरद पवार आपल्या भाषणात म्हणाले.