राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटपावर चर्चा सुरु आहे. जागा वाटपावर दावे प्रतिदावे केले जात आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी उबाठा शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेची उमेदवारी जाहीर केली. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी संजय राऊत यांना खडे बोल सुनावले आहेत. पवार यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसकडून प्रतिक्रिया आली आहे. त्याला पुन्हा संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. यामुळे महाविकास आघाडीत जागा वाटपापूर्वीच सुंदोपसुंदी सुरु झाली आहे.
श्रीगोंद्याच्या जागेवरून शरद पवार यांनी संजय राउतांवर यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे. शरद पवार म्हणाले की, शिवसेनेच नेते येणार आणि उमेदवार जाहीर करणार असा अधिकार कोणालाही नाही. तीन पक्ष मिळवून उमेदवार ठरवणार आहे. शिवसेनेकडून एकट्याने उमेदवारी घोषित करणे बरोबर नाही, असे पवार म्हणाले. संजय राऊत यांनी शिवसेनेची उमेदवारी जाहीर केल्यामुळे राष्ट्रवादीकडून इच्छुक उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांनी शरद पवारांची भेट घेतली.
काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी संजय राऊत यांच्या उमदेवारी जाहीर करण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, कुठलाही निर्णय न होता उमेदवार जाहीर करणे चुकीचा आहे. पवार साहेब म्हणतात, ते बरोबर आहे. कारण जेव्हा तिन्ही पक्षाचा निर्णय होईल तेव्हाच उमेदवार जाहीर केले पाहिजे.
शरद पवार यांच्या वक्तव्यावर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत म्हणाले की, शरद पवार यांच्याकडे श्रीगोंदाबाबत चुकीची माहिती आहे. प्रत्येक पक्ष आपल्या उमेदवारांना काम करण्यासाठी संदेश देत असतो. अनेक मतदारसंघात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते कार्यकर्त्यांना आदेश देतात, तयारी लागा. परंतु श्रीगोंद्यात काय घडले हे मला माहीत नाही. आम्ही कार्यकर्त्यांना तयारीला लागा, कामाला लागा, पुढे व्हा असा संदेश दिला तर चुकीचे नाही. हेच संदेश पवार साहेब आणि नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांना दिला असेल तर त्यात चुकीचे नाही. आमची तर २८८ मतदारसंघात तयारी आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये अटीतटीची लढत झाली होती. भाजपचे उमेदवार बबनराव पाचपुते १,०३,२५८ मतांनी विजयी झाले होते. तर राष्ट्रवादीचे उमेदवार घनश्याम प्रतापराव शेलार यांना ४,७५० मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता.