राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री धर्मरावबाबा अत्राम यांच्या मतदारसंघात माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे मोठी राजकीय खेळी करण्याच्या तयारीत आहेत. शरद पवार हे आगामी विधानसभा निवडणुकीत धर्मरावबाबा अत्राम यांच्या विरोधात त्यांच्याच कन्या भाग्यश्री अत्राम हलगेकर यांना उमेदवारी देण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे धर्मरावबाबा संतापले आहेत. त्यांनी शरद पवार यांच्यावर अतिशय खोचक शब्दांत टीका केली आहे. “शरद पवार हे 82 वर्षांचे आहेत. त्यांनी लोकशाही मार्गाने राजकारण केलं पाहिजे. पण त्यांनी आपली संपूर्ण कारकीर्द ही दुसऱ्याचे पक्ष आणि घरे फोडण्यात घालवली. आतादेखील ते दुसऱ्या नेत्यांची घरे फोडून त्यांच्या मुलांना आई-बापा विरुद्ध उभे करत आहेत. आम्ही देखील शरद पवार यांच्याकडूनच फोडाफोडीचे राजकारण शिकलो आहोत”, अशी खोचक टीका धर्मरावबाबा अत्राम यांनी केली. त्यांच्या या टीकेवर खासदार प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी धर्मरावबाबा अत्राम यांना घरचा आहेर दिला.
“मी देखील शरद पवार यांच्याकडूनच शिकलो आहे. माझ्यासाठी ते आदरणीय होते आणि अजूनही आहेत. पण एका आदरणीय नेत्याचा सन्मान कमी होता कामा नये, असं माझ्या मनात आहे”, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले. प्रफुल्ल पटेल यांच्या या वक्तव्यावर आता धर्मरावबाबा अत्राम काय प्रतिक्रिया देतात? ते आगामी काळात समोर येईल. पण विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात संघर्ष होताना दिसत आहे. असं असलं तरीही प्रफुल्ल पटेल यांच्याकडून शरद पवार यांचा आदर राखला जातोय.
दरम्यान, राज्याची उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. मात्र त्यांच्यासोबत मंत्री छगन भुजबळ हे दौऱ्यादरम्यान नव्हते. यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. यावर प्रफुल्ल पटेल यांना विचारले असता, त्यांनी त्यांच्या अनुपस्थितीचा कुठलाही अर्थ-अनर्थ काढू नका, असं सांगितलं. आम्ही महायुती म्हणून सगळे सोबत आहोत आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही ताकदीने लढणार आहोत, असंही प्रफुल्ल पटेल म्हणाले.
अजित पवार हे वेशांतर करुन दिल्लीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीला जात असल्याच्या चर्चांवर प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली. विरोधकांकडून या मुद्द्यावरुन अजित पवार यांच्यावर टीका केली जात आहे. त्यावर प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली. “अजित पवार हे महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत. त्यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करणे योग्य नाही”, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.
आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीतील घटक पक्ष कोणत्या जागांवर लढणार यावर अनेक चर्चा सुरू आहेत. यावर राष्ट्रवादी नेते प्रफुल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली. महायुती म्हणून आम्ही सगळे एकत्र लढणार आहोत. योग्य पद्धतीने जागांचं वाटपही होणार आहे. मात्र, कोणता पक्ष कुठे लढेल याबद्दल अजून चर्चा झालेली नाही, अशी प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी दिली.
अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ल्या केल्यानंतर हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झालेला मनसे कार्यकर्ता जय मालोकार हा राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये येणार होता, असा दावा अमोल मिटकरी यांनी केला होता. याबाबत प्रफुल्ल पटेल यांना प्रश्न विचारण्यात आला. मला या संदर्भात काही माहिती नाही, असं सांगितलं. यावेळी त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांना एक सल्ला दिला. त्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर घसरु नये, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.
राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामध्ये पेनड्राइव्ह वरून वार पेटलेला आहे. यावर प्रफुल्ल पटेल यांनी सर्वपक्षीय नेत्यांना महाराष्ट्राच्या राजकारणाच्या स्तर खाली येऊ देऊ नका, असं आवाहन केलं. यामुळे महाराष्ट्राची बदनामी होते, असं पटेल म्हणाले. तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेवरून देखील राजकारणाच्या स्तर घसरू देऊ नका. सर्वांचा सन्मान करायला शिका, असा सल्ला प्रफुल्ल पटेल यांनी दिला.