शिवसेनेचे हिंगोलीचे नवे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर कोण आहेत?

| Updated on: Apr 03, 2024 | 8:08 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार बदलण्यात आला आहे. विशेष म्हणजे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांची जाहीर झालेली उमेदवारी रद्द करण्यात आली आहे.

शिवसेनेचे हिंगोलीचे नवे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर कोण आहेत?
Follow us on

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा ट्विस्ट आला आहे. कारण शिवसेनेकडून हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी जाहीर करण्यात आलेला उमेदवार बदलण्यात आला आहे. शिवसेनेकडून खासदार हेमंत पाटील यांना देण्यात आलेली उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. भाजपच्या दबावामुळे अखेर शिवसेनेला हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करावी लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून गेल्या आठवड्यात 8 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती. त्यामध्ये हिंगोली मतदारसंघातून विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. पण भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. अखेर त्यांच्या विरोधामुळे शिवसेनेला हिंगोलीचा उमेदवार बदलावा लागला आहे. हेमंत पाटील यांच्याऐवजी आजा शिवसेनेकडून बाबुराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

बाबुराव कदम कोहळीकर कोण आहेत?

शिवसेनेकडून 2014 ला हदगांव हिमायत नगरमधून उमेदवारी दिली होती. मात्र त्यांचा पराभव झाला होता. बाबुराव कदम कोहळीकर यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेनेसोबत बंडखोरी केली होती. त्यांनी बंडखोरी करत हदगांव हिमायत नगरमधून विधानसभा निवडणूक लढवली होती. बाबुराव कदम हे शिवसेना नांदेड जिल्ह्याचे 5 वर्ष जिल्हाप्रमुख होते. बाबुराव कदम कोहळीकर सध्या शिवसेनेचे नांदेड जिल्ह्याचे प्रमुख आहेत. विशेष म्हणजे गेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून उमेदवारी लढवणारे कोहळीकर हे दोन नंबरला लीडला होते.

हेमंत पाटील कोण आहेत?

हेमंत पाटील हे एकेकाळी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जायचे. ते 2013 मध्ये नांदेड जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख होते. तर 2014 मध्ये ते शिवसेनेच्या तिकीटावर नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून विजयी झाली होती. यानंतर 2019 च्या लोकसभेवेळी त्यांचं पक्षाकडून प्रमोशन करण्यात आलं होतं. उद्धव ठाकरेंनी त्यांना हिंगोली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत हेमंत पाटील हे जिंकून आले होते.

हेमंत पाटील यांची उमेदवारी गेली पण…

हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द होणार असली तरी त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दिलासा मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेकडून हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात येणार आहे. पण यामुळे यवतमाळ-वाशिमच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांचं तिकीट कापलं जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणात काय-काय घडामोडी घडतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.व