उद्धव ठाकरे यांची जुन्या पेन्शन योजेनाबाबत मोठी घोषणा, निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना अच्छे दिन येणार?

| Updated on: Sep 15, 2024 | 4:47 PM

उद्धव ठाकरे यांनी जुनी पेन्शन योजनेबाबत मोठी घोषणा केली आहे. जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी अनेक वर्षांपासून कर्मचाऱ्यांची मागणी आहे. या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलनही केलं. अखेर उद्धव ठाकरे यांनी याबाबत मोठी घोषणा केल्याने आता कर्मचाऱ्यांच्या या मागणीबाबत सरकार सकारात्मक भूमिका घेतं का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

उद्धव ठाकरे यांची जुन्या पेन्शन योजेनाबाबत मोठी घोषणा, निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना अच्छे दिन येणार?
उद्धव ठाकरे
Follow us on

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जुन्या पेन्शन योजेनबाबात मोठी घोषणा केली. ते शिर्डीतील कार्यक्रमात बोलत होते. आपलं सरकार आणा. “मी तुमची जुन्या पेन्शन योजनेची मागणी पूर्ण करतो”, असं मोठं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीदेखील अशाच प्रकारची घोषणा केली. त्यामुळे आगामी काळात महाविकास आघाडीचं सरकार आलं तर निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना अच्छे दिन येणार आहेत. “जमलेल्या माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो, आपण सर्व कुटुंब आहोत. आमच्या बहिणींना, भावांना न्याय द्या, असं साईबाबांकडे साकडं घातलं. माझा पक्ष, चिन्हं आणि वडील पण चोरले आहेत. मला दिवारचा डायलॉग आठवला? मेरे पास ईमान है. विश्वास है. एकजूट ठेवा. फोडाफोडीचे राजकारण जे आमच्यासोबत झालं ते तुमच्या सोबतही होईल. यांना टेंशन द्या, उपोषणाची हाक दिली. पण ते करू नका. आधीच उपाशी, यांना सत्तेवाचून उपाशी ठेवा”, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.

“मिंधे आणि त्यांचे चमचे टिव्हीवर बघतात. लाडकी बहीण योजना आणली. आपलं सरकार आणा. मी तुमची जुनी पेन्शन योजनेची मागणी पूर्ण करतो. सरकारला घाम फुटणार आणि कदाचित कॅबिनेट घेऊन घोषणा करतील. मला किती पेन्शन मिळणार माहीत नाही. मी अजून रिटायर नाही. पण मी सत्तेतून रिटायर होणार नाही. माझा महाराष्ट्र म्हणजे तुम्हासारखी हाडा माणसाची माणसं. आम्ही कंत्राटी, तुम्ही सरकार चालवता. कोविडमध्ये तुम्ही नसता तर महाराष्ट्र टिकला नसता. मीच तुझा भाऊ, आणि हे फुकट खावू. हे उपटसुंबे”, अशी खोचक टीका उद्धव ठाकरेंची केली.

“केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सांगितलं की, जुनी पेन्शन योजना लागू होणार नाही. तुम्हाला काय वाटतं? हे घोषणा करतील का? दिल्लीला विचारल्याशिवाय हे काही करू शकत नाही”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मंचावर आले. त्यावर ठाकरे म्हणाले, “आता पुढचा बँट्समन आलाय. मी चौके, छक्के लावले आता तुम्ही लावा.” “जशीच्या तशी योजना लागू करण्याचा माझा शब्द आहे. शब्दाला ताकद देण्याची जबाबदारी तुमची”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

नाना पटोले यांची देखील जुन्या पेन्शन योजनेबाबत घोषणा

यावेळी नाना पटोले यांनी देखील पेन्शन योजनेबाबत घोषणा केली. “हे सरकार आता सत्तेबाहेर जाणार. विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सवलतीत देखील आज भेदभाव केला जातोय. राज्यावर 10 लाख कोटींपेक्षा जास्त कर्ज आहे. मंत्री देखील आता तुमच्याकडे येणार अशी माहिती मला मिळाली आहे. आमच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये तुमचा निर्णय घेऊ. जाहीरनाम्यात देखील जुन्या पेन्शनचा मुद्दा राहील”, असं नाना पटोले म्हणाले.

“अटलजींच्या काळात योजनेला खोडा लागायला सुरूवात झाली आणि ते काँग्रेसवर आरोप करतात. जिथे आमचं सरकार तिथे जुन्या पेन्शनचा निर्णय झालं. मात्र राजस्थानमध्ये योजना लागू करूनही आमचं सरकार गेलं. आमच्यावर आरोप करतात की, आम्ही ही योजना बंद केली. मात्र अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळापासून याची सुरवात झाली. जिथे देशात आमचं सरकार आहे तिथे आम्ही सत्तेत आल्यावर जुनी पेन्शन योजना सुरू केली. लोकसभा निवडणुकीत जो निर्णय आला त्यात तुमचं मोठ काम आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत तुमची साथ राहील. तुम्हाला टेन्शन देणारा आता आमच्यात राहिला नाही. त्याला दुर्बुद्धी आली आणि तो तिकडे गेला”, असा टोला नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला.