सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत मोठा राडा, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सुरक्षा रक्षकांना दिला चोप

| Updated on: Sep 30, 2024 | 4:35 PM

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड राडा घातल्याचं बघायला मिळालं. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी जिल्हा परिषदेतील सुरक्षा रक्षकांना मारहाण केली. यावेळी ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक देखील तिथे उपस्थित होते. वैभव नाईक यांनी या प्रकरणी गंभीर आरोप केले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत मोठा राडा, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सुरक्षा रक्षकांना दिला चोप
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत मोठा राडा, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सुरक्षा रक्षकांना दिला चोप
Follow us on

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी राडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून यावेळी सुरक्षा रक्षकालादेखील मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. सावंतवाडी पंचायत समिती इमारतीच्या कंत्राटावरुन हा वाद झाल्याची माहिती समोर येत आहे. कंत्राटाची कागदपत्रे जमा करताना खासगी सुरक्षा रक्षक आणल्याने वाद झाला. यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सुरक्षा रक्षकाला चांगलीच मारहाण केली. संबंधित घटनेचे व्हिडीओदेखील समोर आले आहेत. या व्हिडीओमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी तीन खासगी सुरक्षा रक्षकांना अक्षरश: पळवून-पळवून मारहाण केल्याचं स्पष्ट दिसत आहे. यावेळी ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक हे देखील तिथे उपस्थित होते. वैभव नाईक यांनी या घटनेवर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.

वैभव नाईक काय म्हणाले?

शिवसेना तर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयात आज सतीश सावंत, संदेश पारकर, सुशांत यांच्या नेतृत्वाखाली आज भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन होतं. हे आंदोलन झाल्यानंतर आम्ही सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीसाठी उपस्थित होतो. यावेळी आमच्याकडे जिल्हा परिषदेत काही माणसं येऊन सरपंचांना, ठेकेदारांना, अधिकारांना येऊन त्यांची तपासणी करतात, अशी माहिती मिळाली. आम्ही सीईओंना तशी माहिती दिली. पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे आम्ही आंदोलन संपल्यावर आम्ही पावणे दोन वाजता या ठिकाणी आलो तेव्हा 8 ते 9 बाऊन्सर, त्यात 2 राजकीय पदाधिकारी गाडीत बसून या सगळ्या लोकांची तपासणी करत होते. आम्ही त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे, असं वैभव नाईक यांनी सांगितलं.

“आमच्या तेव्हा लक्षात आलं की, सावंतवाडी पंचायत समितीचं 8 कोटींचा एक टेंडर आहे. ते मॅनेज करण्यासाठी हे खासगी सुरक्षा रक्षक (बाऊन्सर) या ठिकाणी बसलेले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज अनेक कामं मॅनेज होतात. त्यामुळेच आणि अधिकाऱ्यांना दमदाटी केल्यामुळे, भ्रष्टाचारामुळे आज शिवाजी महाराजांचा पुतळा पडला आहे. अशा भ्रष्टाचारामुळे या सगळ्या गोष्टी घडत आहेत. त्यामुळे जिल्हा सीईओंना भेटून आम्ही लेखी तक्रार केली आहे की, ह्यांच्यावर कारवाई व्हावी आणि त्या कामाला मुदतलवाढ मिळावी”, अशी भूमिका वैभव नाईक यांनी मांडली. “सीसीटीव्ही तपासल्यावर ते राजकीय नेते कोण होते ते देखील स्पष्ट होईल”, असं वैभव नाईक यांनी स्पष्ट केलं.

ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याचा गंभीर आरोप

ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याचा एक व्हिडीओदेखील समोर आला आहे. या व्हिडीओत पोलिसांच्या बाजूला तीन खासगी बॉडीगार्ड उभे आहेत. ते जिल्हा परिषदेचे सर्वसामान्यांचे कागदपत्रे तपासत असतात, असा दावा व्हिडीओतील कार्यकर्ता करत आहे. यावेळी या कार्यकर्त्याची पोलिसांसोबतही बाचाबाची होते. “आमच्या जिल्ह्यामध्ये येऊन हे बाहेरचे लोकं उपरेगिरी करतात आणि आम्ही ऐकून घ्यायचं. या तीनही लोकांनी आमच्या फाईली काढून घेतल्या”, असा आरोप ठाकरे गटाचा कार्यकर्ता करताना दिसतो. या कार्यकर्त्याने सुरक्षा रक्षकांचे मोबाईल हिसकावलेले असतात. पोलिसांनी समजूत काढल्यानंतर हा कार्यकर्ता त्या खासगी सुरक्षा रक्षकांचे मोबाईल फोन देतो, असं व्हिडीओत दिसत आहे.