राज्यातील चार बड्या नेत्यांना कारागृहात टाकण्याचा डाव आखण्यात आला होता. त्यात शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे, शिवसेना उबाठा नेते अनिल परब यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा समावेश होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यामार्फत या चौघांना कारागृहात टाकण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु अनिल देशमुख यांनी त्या चार प्रतिज्ञापत्रावर सही केली नाही, यामुळे हे चौघे नेते वाचले आणि अनिल देशमुख कारागृहात गेले, असे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना सांगितले. दरम्यान या आरोपांना अनिल देशमुख यांनी दुजोरा दिला आहे.
श्याम मानव यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे यांनी शंभर कोटी रुपये जमा करण्यास मला सांगितले होते, असे प्रतिज्ञापत्र अनिल देशमुख यांना दिले. दुसरे प्रतिज्ञापत्र आदित्य ठाकरे यांच्यासंदर्भात होते. त्यात दिशा सालियान प्रकरणात अडकवण्यासंदर्भात होते. परंतु अनिल देशमुख यांनी खूप विचार केला. त्यांच्याकडे आलेल्या या चार प्रतिज्ञापत्रांवर सही करण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांना कारागृहात जावे लागले. तिसरे प्रतिज्ञापत्र अनिल परब तर चौथे प्रतिज्ञापत्र अजित पवार यांच्यासंदर्भात होते.
राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्याकडे अंमलबाजावणी संचालनालयच्या (ईडी) कारवाईपासून वाचवण्यासाठी निरोप दिला जातो. त्यानुसार त्यांना सांगितले गेले की, आम्ही तुमच्याकडे चार प्रतिज्ञापत्र पाठवलेले आहेत. यावर सही केल्यास तुमची ईडी कारवाईतून सुटका होईल. परंतु त्यांनी सही केली नाही, असे श्याम मानव यांनी म्हटले.
या प्रकरणात अनिल देशमुख यांनीही भूमिका मांडली आहे. त्यांनी म्हटले की, श्याम मानव यांनी जे सांगितले ते सत्य आहे. तीन वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब आणि अजित पवार यांच्यावर आरोप करण्यास सांगितले होते. त्यासंदर्भातील प्रतिज्ञापत्र त्यांनी लिहून एका व्यक्तीमार्फत माझ्याकडे देवेंद्र फडणवीस यांनी पाठवले होते. परंतु आपण आयुष्यभर कारागृहात राहू, परंतु कोणावर खोटा आरोप करणार नाही, असे अनिल देशमुख यांनी म्हटले.
हे ही वाचा