पंढरपुरात महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवणाऱ्या घडामोडी? राष्ट्रवादीला मोठं खिंडार, आता पुढचं टार्गेट कोण?

| Updated on: Jun 27, 2023 | 5:54 PM

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. या घडामोडींपैकी पंढरपुरात आज घडलेली घडामोड महत्त्वाची मानली जात आहे. कारण पंढरपुरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याने बीआरएस पक्षात प्रवेश केला आहे.

पंढरपुरात महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवणाऱ्या घडामोडी? राष्ट्रवादीला मोठं खिंडार, आता पुढचं टार्गेट कोण?
BHAGIRATH BHALKE
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

सोलापूर : महाराष्ट्राच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला अजून एक वर्षाचा काळ शिल्लक आहे. पण या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकारणीय घडामोडींना आतापासूनच वेग आला आहे. राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात आपल्या बीआरएस पक्षाचा विस्तार करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे बीआरएसने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा झटका दिला आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपुरातील दिवंगत आमदार भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी के चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षात प्रवेश केला आहे.

भगीरथ भालके यांच्या पंढरपुरातील सरकोली गावात भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात भालके यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला. यावेळी बीआरएस पक्षाकडून चांगलंच शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. के चंद्रशेखर राव यांनी यावेळी भाषण करताना ‘अबकी बार, किसान सरकार’ अशी घोषणाबाजी केली. “महाराष्ट्रात बीआरएसचं सरकार आणा, शेतकऱ्यांचा विकास करु”, असं केसीआर म्हणाले.

‘इतर पक्षात भीतीचं वातावरण का आहे?’

“बीआरएस पक्षाच्या महाराष्ट्र प्रवेशामुळे इतर पक्षात भीतीचं वातावरण का आहे? असा प्रश्न के चंद्रशेखर राव यांनी उपस्थित केला आहे. “बीआरएस ही शेतकऱ्यांची टीम आहे, कोणत्याही राजकीय पक्षाची नाही”, असं केसीआर म्हणाले आहेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बीआरएस पक्षाला कमी समजू नका, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आज पंढरपुरात के चंद्रशेखर राव यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

हे सुद्धा वाचा

“महाराष्ट्रात आमची आता कुठे सुरुवात झालीय. पण महाराष्ट्रातील इतर पक्षांचा इतका आक्रोश का आहे? एवढी भीती का आहे? भाजपचं वक्तव्य, काँग्रेसचं एक वक्तव्य. काँग्रेसने भाजपचं बी टीम म्हटलं. भाजपने आम्हाला काँग्रेसची ए टीम म्हटलं. ही टीम नेमकी कुठून येते? आम्ही कुणाचीच टीम नाहीत. आम्ही फक्त शेतकऱ्यांची टीम आहोत”, असं के चंद्रशेखर राव म्हणाले.

चंद्रशेखर राव आणखी काय-काय म्हणाले?

“महाराष्ट्रातील सर्व पक्षांना लोकांनी सत्तेची संधी दिली आहे. मात्र त्यांनी जनतेसाठी काय केले? तेलंगणाचा सर्व मामला हे भुलभूलैय्या आहे, असे सांगत आहेत. तेलंगणातील योजना महाराष्ट्रात लागू केल्या तर राज्याचे दिवाळ निघेल. मात्र मी म्हणतो दिवाळ निघेल पण ते नेत्यांचे निघेल.”

“आम्ही चार महिने झाले महाराष्ट्रात आलो आणि सर्व पक्ष आमच्यावर टीका करत आहेत. वास्तविक पाहता हे घाबरलेले आहेत, म्हणून चुकीच्या गोष्टी बोलत आहेत. मात्र आमचा नारा आहे की, भारतातील शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती करायची आहे.”

“मंगळवेढ्यातील 35 गावांना पाणी दिले जात नाहीत. सोलापूर, पंढरपूर, अकोला या शहरांत पाणी कमी दिले जाते. मात्र भारतातील जलनितीला उचलून बंगालच्या खाडीत फेकले पहिजे. आता नवीन जलनीतीची गरज आहे. मात्र केंद्र सरकार ते करत नाही.”

“भारतात पाणी, वीज मुबलक आहे. भारतातील वीज नीती बदलली पाहिजे. पुढील 150 वर्षे पुरेल एवढा कोळसा भारतात आहे. मात्र तो ऑस्ट्रेलियात आयात केला जातो. असे असताना खासगीकरण केले जात आहे.”

“महाराष्ट्रात रोज आठ ते दहा आत्महत्या होत आहेत हे ऐकून वाईट वाटते. आम्ही तेलंगणात शेतकऱ्यांना 24 तास मोफत वीज दिली आहे. पेरणीसाठी एकरी 10 हजार रुपये देतो. राज्यातील सर्व धान्य सरकार खरेदी करते.”

“ऊसाच्या दरासाठी दरवर्षी संघर्ष करावा लागतो. सरकारमध्ये एवढा दम नाही का की,ते ऊसाच्या दरावर कायमचा तोडगा काढू शकत नाहीत?”

“देशातला शेतकरी जगला तर कोण मरणार? शेतकरी मेला तर कोण जगणार? आम्ही दिव्यांग बांधवाना 4 हजार मदत देतो. महाराष्ट्रात BRS पक्षाच्या हाती सरकार द्या. आम्ही तेलंगणातील सर्व योजना लागू करू. महाराष्ट्राचे दिवाळ निघणार नाही हा शब्द देतो”

“येथील पक्ष प्रस्थापित आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नांदेडमध्ये आल्यावर ते म्हणाले तुमचे इथे काय काम? मी म्हणालो मी देशाचा नागरिक आहे, कुठेही जाऊ शकतो.”

“तुम्ही माझ्या योजना महाराष्ट्रत लागू करा. मी मध्यप्रदेशमध्ये जातो. महाराष्ट्र सरकारने पीएम किसान योजना सुरु केली आणि त्याना 6 हजार जाहीर केले. मात्र आम्ही सर्व शेतकऱ्यांना मदत देतो कोणालाही टाळत नाही. आम्ही तेलंगणातील तलाठी व्यवस्था बंद केली”