स्पेशल रिपोर्ट : छगन भुजबळांच्या डोक्यात चाललंय काय?

| Updated on: Jun 17, 2024 | 10:28 PM

ओबीसींचा मुद्दा आणि त्याचबरोबर लोकसभेपाठोपाठ राज्यसभेवर मंत्री छगन भुजबळ यांना डावललं गेल्याचा सूर समता परिषदेच्या बैठकीत उमटल्याची माहिती आहे. त्यामुळे भुजबळांनी राजीनामा देवून त्यांनी आता वेगळा निर्णय करावा, अशीही मागणी बैठकीत झाल्याचं समोर आलंय.

स्पेशल रिपोर्ट : छगन भुजबळांच्या डोक्यात चाललंय काय?
छगन भुजबळ
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात काय-काय घडामोडी घडतात ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्रात याआधीच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही महत्त्वाच्या पक्षांमध्ये फूट पडली आहे. त्यात आता मंत्री छगन भुजबळ यांनी वेगळा निर्णय घेतला तर महाराष्ट्राच्या राजकारणात काय-काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामागील कारणही अगदी तसंच आहे. लोकसभेपाठोपाठ राज्यसभेवरुन नाराजीच्या चर्चा आणि ओबीसींचा मुद्दा यावरुन मंत्री छगन भुजबळ वेगळ्या निर्णयाच्या तयारीत आहेत का? अशा चर्चा सुरु आहेत. भुजबळांनी वेगळा निर्णय घ्यावा, असा समता परिषदेतून सूर निघाल्याची चर्चा आहे. यातून महायुतीतून भुजबळ बाहेर पडणार की मग दबावतंत्र सुरु आहे? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. या दरम्यान भुजबळांनी नाराजीच्या सर्व चर्चा फेटाळल्या आहेत.

ओबीसींचा मुद्दा आणि त्याचबरोबर लोकसभेपाठोपाठ राज्यसभेवर मंत्री छगन भुजबळ यांना डावललं गेल्याचा सूर समता परिषदेच्या बैठकीत उमटल्याची माहिती आहे. त्यामुळे भुजबळांनी राजीनामा देवून त्यांनी आता वेगळा निर्णय करावा, अशीही मागणी बैठकीत झाल्याचं समोर आलंय. तसं झाल्यास भुजबळ शरद पवारांच्या पक्षात परतणार की मग त्यांच्या मूळ ठाकरेंच्या शिवसेनेत जाणार? याच्याही चर्चा रंगत आहेत. समता परिषदेच्या बैठकीत दोन गोष्टींवर चर्चा झाल्याची माहिती आहे. एक म्हणजे जरांगेंच्या मागण्या पूर्ण करुन ओबीसींवर अन्याय होतोय. आणि दुसरं म्हणजे लोकसभेपाठोपाठ राज्यसभेवरही भुजबळांना डावललं जातंय.

भाजपची प्रतिक्रिया काय?

या प्रकरणावर भाजप नेते राम शिंदे यांनी प्रतिक्रिया दिलीय. “महायुती अभेद आहे. आता कोणताही चुकीचा नरेटीव्ह सेट होणार नाही ओबीसींना न्याय देण्याची भूमिका असणार आहे. ओबीसी हा आमचा डीएनए आहे”, असा दावा राम शिंदे यांनी केलाय.

भुजबळांचं दबावतंत्र आहे की मग…?

वर्षभरापूर्वीच राज्यात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी बिहारच्या धर्तीवर जातनिहाय जनगणना करण्यास सकारात्मकता दाखवलीय. मात्र केंद्रानं जातगणना करावी, अशी मागणी भुजबळांनी केलीय. भुजबळ आता महायुतीच्या सत्तेत मंत्री आहेत. त्यामुळे मंत्रीपद सोडून ते दुसरा निर्णय घेणार का? हा सुद्दा प्रश्न महत्वाचा आहे. त्यामुळे हे भुजबळांचं दबावतंत्र आहे की मग खरोखर ते वेगळ्या विचाराच्या भूमिकेत आहेत, हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.