ST Strike: नाशिक विभागात 20 कर्मचाऱ्यांचे निलंबन; सर्व डेपोमध्ये आंदोलन तीव्र, प्रवाशांचे प्रचंड हाल!

| Updated on: Nov 10, 2021 | 11:25 AM

नाशिक विभागातील जवळपास 20 कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यामुळे एसटी कर्मचारी आक्रमक झाले असून, त्यांनी विभागातील सर्व डेपोमध्ये आंदोलन तीव्र केले आहे.

ST Strike: नाशिक विभागात 20 कर्मचाऱ्यांचे निलंबन; सर्व डेपोमध्ये आंदोलन तीव्र, प्रवाशांचे प्रचंड हाल!
नाशिक जिल्ह्यात एसटी आंदोलन तीव्र झाल्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहेत.
Follow us on

नाशिकः नाशिक विभागातील जवळपास 20 कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यामुळे एसटी कर्मचारी आक्रमक झाले असून, त्यांनी विभागातील सर्व डेपोमध्ये आंदोलन तीव्र केले आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे राज्यातील बससेवा पूर्णतः ठप्प झाली आहे. चाकरमानी कोंडीत सापडले असून, खासगी प्रवासी वाहतूकदारांनी पुण्यासाठी 1000, औरंगाबादसाठी 1200, मुंबईसाठी 600, नंदुरबारसाठी जवळपास 1600 रुपयांचे भाडे आकारणे सुरू केले आहे. इतके करूनही प्रवासाला वाहन मिळत नाही. हे पाहता लवकरात लवकर या संपावर तोडगा काढावा, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी राज्यभरातील कर्मचारी आक्रमक झाले आहेत. त्यांनी ऐन दिवाळीत संप पुकारल्याने सर्वसामान्यांची मोठी कोंडी झाली आहे. नाशिक विभागातील सर्वच्या सर्व 13 डेपोतील कर्मचारी या आंदोलनात सहभागी झालेत. नाशिक, येवला, मनमाड, मालेगाव, नांदगावसह जिल्ह्यातील इतर तालुक्यातले कर्मचारीही आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय सुरू आहे. अनेक चाकरमानी दीपावली सुट्टीसाठी कुटुंबासह गावी गेले आहेत. त्यांना नोकरीच्या ठिकाणावर परतता येत नाही. त्यामुळे ते ठिकठिकाणच्या एसटी आगारावरच अडकून पडले आहेत.

2100 बस फेऱ्या रद्द

नाशिक जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. संपाच्या पहिल्याच दिवशी नाशिक जिल्ह्यात 2100 बस फेऱ्या रद्द झाल्या. गेले तीन दिवसही हेच चित्र आहे. त्यामुळे एसटीचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आता आजही या बस फेऱ्या रद्द होणार आहेत. त्यामुळे संप मिटेपर्यंत हा आर्थिक फटका महामंडळाला बसणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या सरकारने गांभीर्याने घ्याव्यात. त्या तातडीने सोडवाव्यात अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. आम्ही जो संप पुकारला आहे, तो कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या तुटपुंजा पगारावरून आहे. या पगारात आमचा प्रपंच चालत नाही. अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली असून, ती वेळ आमच्यावर येऊ नये आणि एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण झाले पाहिजे, या मागणीवर आम्ही ठाम आहोत, असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. या आंदोलनामुळे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत साऱ्यांची फरपट सुरू आहे. हा संप सरकारने लवकरात लवकर मिटवावा, अशी मागणी होत आहे.

इतर बातम्याः

पिंपळगाव बाजार समितीतले कांदा लिलाव बंद; माथाडी कामगार अन् व्यापाऱ्यांमध्ये वाद

बहुचर्चित कांदे-भुजबळ वादाची मुख्यमंत्र्यांकडून दखल; प्रशासकीय कागदपत्रे मागवली