भाजपसोबत जाण्याचा प्रयत्न कधी-कधी झाला? सुनील तटकरे यांचा वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात गौप्यस्फोट

| Updated on: Jun 10, 2024 | 6:34 PM

"लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांनी मोठ्या मनाने पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे. देशात वेगळं वातावरण होतं. राज्यात वेगळं वातरण होतं. निवडणुकीत अपप्रचार केला गेला. त्यामुळे काही मतदार आमच्यापासून दुरावले गेले", असा दावा सुनील तटकरे यांनी केला.

भाजपसोबत जाण्याचा प्रयत्न कधी-कधी झाला? सुनील तटकरे यांचा वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात गौप्यस्फोट
अजित पवार आणि सुनील तटकरे यांचा फाईल फोटो
Follow us on

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आज मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये वर्धापन दिनाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात खासदार सुनील तटकरे यांनी भाषण केलं. “निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका केलीय. 2004 मध्ये लोकसभेमध्ये फार काही यश मिळालं नव्हतं. पण विधानसभेत मोठं यश मिळालं. सर्वात जास्त मतं विधीमंडळात छगन भुजबळ यांना मिळाली होती. तरी भुजबळ मुख्यमंत्री झाले नाही. बारामतीमध्ये सर्वात जास्त मताने निवडून आलेले अजित दादा होते. शरद पवार यांना मंत्रीपदाचा 7 वर्षाचा अनुभव होता. तेव्हा ते पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले होते. तसंच अजितदादांचादेखील 7 वर्षाचा अनुभव होता. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री झाला असता”, अशी खंत सुनील तटकरे यांनी व्यक्त केली.

“भारतीय जनता पक्षासोबत जाण्याची चर्चा 2014 मध्ये झाली होती. आम्ही 2016 मध्येही भाजपसोबत जात होतो. पण भाजपसोबत शिवसेना होती म्हणून आम्हाला तेव्हा शिवसेना चालत नव्हती. 2019 मध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भाजपसोबत जायचं ठरलं होतं”, असा गौप्यस्फोट सुनील तटकरे यांनी केलं.

‘अजित पवार पहिल्या रांगेत बसले ते काहींना पचत नाही’

“लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांनी मोठ्या मनाने पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे. देशात वेगळं वातावरण होतं. राज्यात वेगळं वातरण होतं. निवडणुकीत अपप्रचार केला गेला. त्यामुळे काही मतदार आमच्यापासून दुरावले गेले. आपण एक जागा जिंकलेली आहे, तरी आपला कार्यकर्ता खचून गेलेला नाही. आपल्याला आता विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जायचं आहे. आपले अजित दादा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधीच्या कार्यक्रमात पहिल्या रांगेत बसले होते ते काही लोकांना पचत नाही”, असं सुनील तटकरे म्हणाले.

“काही लोक बोलत आहेत की, दिल्लीमध्ये लाचारी करावी लागत आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो, माझी आपल्या सर्व प्रवक्तांना विनंती आहे की, जागा संदर्भात काहीही बोलू नये. ना समोरच्या सहयोगी पक्षाचे प्रवक्ते काही बोलतील. सर्वांना वाटत होतं की, मंत्रिमंडळात आपल्याला स्थान मिळावे. प्रसारमाध्यमांवर काही बातमी चालत होती. तेव्हा सांगितलं होतं की, संख्याबळाच्या आधारे एक जागा मिळेल. मी सांगितलं की, प्रफुल्ल पटेल यांना मंत्री बनवा. मी अजित दादांना संकटात आणणार नाही”, अशी भूमिका सुनील तटकरे यांनी मांडली.