धोबीघाट परिसर भीतीच्या छायेत, इर्शाळवाडीसारखी घटना घडण्याची शक्यता

| Updated on: Jul 26, 2023 | 3:27 PM

गेल्या अनेक वर्षांपासून या घरांना लागून एखादी संरक्षण भिंत बांधावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी पालिका प्रशासनाकडे केली होती. मात्र मागील वर्षी पालिकेने अर्धवट भिंत बांधली.

धोबीघाट परिसर भीतीच्या छायेत, इर्शाळवाडीसारखी घटना घडण्याची शक्यता
Follow us on

ठाणे : उल्हासनगर महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या धोबीघाट परिसरात स्वामी विवेकानंद शाळेच्या मागे असलेल्या टेकडीवर रहिवासी वस्ती आहे. या ठिकाणी शेकडो परिवार वास्तव्य करत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या घरांना लागून एखादी संरक्षण भिंत बांधावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी पालिका प्रशासनाकडे केली होती. मात्र मागील वर्षी पालिकेने अर्धवट भिंत बांधली. निधीच्या अभावी काम पूर्ण करण्यात आले नसल्याचे स्थानिक नागरिक सांगतात.,संरक्षण भिंतीचे काम अपूर्ण असल्याने अनेक नागरिकांच्या घराजवळील काही भाग हा ढासळला असल्याचे दिसून येत आहे.

काही घरांना गेले तडे

काही नागरिकांच्या घरांना तडेदेखील जात असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे यावर्षी पुन्हा स्थानिक नागरिकांनी पालिका प्रशासनासोबत पत्रव्यवहार करून संरक्षण भिंत बांधून मिळाली, यासाठी निवेदन सादर केले आहे. मात्र अद्याप देखील पालिका प्रशासनाकडून या विषयावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. कदाचित पालिका प्रशासन माळीण किंवा इर्शाळवाडी सारख्या एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट बघत असावी, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिली आहे.

पावसाळ्यात दुसरीकडे करावे लागते वास्तव्य

गेल्या अनेक दिवसांपासून सर्वत्र मुसळधार पावसाने थैमान घातले. या टेकडीवरील रहिवासी भीतीच्या छायेत जगत आहेत. मुसळधार पाऊस सुरु झाल्यानंतर या घरातील नागरिक सुरक्षित ठिकाणी निवारा घेतात. मागील वर्षी देखील स्थानिक राजकीय नेत्यांनी या नागरिकांची सोय स्वामी विवेकानंद शाळेत केली होती. स्वतःचे हक्काचे घर असतानादेखील पावसाळ्यात आम्हाला दुसरीकडे वास्तव्य करावे लागते. याची खंतदेखील नागरिकांनी व्यक्त केली.

शेकडो कुटुंब भीतीच्या छायेत

उल्हासनगर कॅम्पनंबर एकमधील धोबीघाट परिसरात असलेल्या टेकडीवर शेकडो परिवार भीतीच्या छायेत जीवन जगत आहेत. उल्हासनगर महानगरपालिका प्रशासन माळीण किंवा इर्शाळवाडीसारखी एखादी दुर्घटना घडण्याची वाट बघत आहे का ? असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.