ठाण्यातील राजकारणावरून जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घेरले; मुख्यमंत्र्यांवर केला गंभीर आरोप

| Updated on: Jul 01, 2023 | 10:31 AM

संपूर्ण मुंबई खणून ठेवल्यामुळे मुंबईतून बाहेर पडायला नाकीनऊ येत आहेत. मुंबईत यायला मुंबईकरांना दोन-दोन अडीच-अडीच तास ट्रॅफिकमध्ये अडकून पडायला होतं. त्यामुळे मुंबईकर वैतागले असून त्यांना मस्ताप झाला आहे.

ठाण्यातील राजकारणावरून जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घेरले; मुख्यमंत्र्यांवर केला गंभीर आरोप
jitendra awhad
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

ठाणे : ठाण्यातील राजकारणावरून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चांगलीच जुंपली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भेदभाव करत असल्याचा आरोप केला आहे. तसेच मुख्यमंत्री सुडाचं राजकारण करत असल्याचा आरोप करत मौका सभी को मिलता है, असं सूचक विधानही जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. त्यामुळे आव्हाड यांच्या आरोपांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांवर सुडाचे राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. कळवा, मुंब्रा शहराबाबत मुख्यमंत्री कायम दुजाभाव करत असून आम्ही 10 कोटींचा जो निधी मंजूर करून आणला होता तो मुख्यमंत्र्यांनी रद्द केला आहे. आता या विरोधात आम्ही कोर्टात जाणार आहोत. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मौका सभी को मिलता है, हे लक्षात ठेवावं, असा सूचक इशाराही जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे.

हे सुद्धा वाचा

जरा भान बाळगा

ठाण्यातील नालेसफाईच्या मुद्द्यावरूनही जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घेरलं आहे. ठाण्यामध्ये गेल्या 25 वर्षात जेवढं पाणी जमा झालं नाही तेवढं यंदा पहिल्याच पावसात जमा झालं आहे. इतकच नव्हे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ज्या ज्या नाल्यांची पाहणी केली होती, नेमके तेच नाले यावेळी तुंबल्याचा दावा आव्हाड यांनी केला आहे. काय झालं नालेसफाईचं? असा सवाल करतानाच नालेसफाई म्हणजे निव्वळ पैसे खाण्याचा उद्योग असून यामुळे पाणी साठतं ते गोरगरिबांच्या घरात जाऊन. गोरगरिबांचे संसार उघड्यावरती येतात. याचं जरा भान बाळगा, असा सल्लाही आव्हाड यांनी दिला आहे.

गुन्हे दाखल करा

एका दिवसाच्या पावसाने अनेकांचे संसार वाहून गेले आहेत. ज्यांनी नालेसफाई नीट केली नाही. ज्यांच्यावर त्याची जबाबदारी होती. त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली. तसेच मुंबईत रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी केला आहे.

मुंबईबाहेरच्यांना कंत्राटं

मुंबईत सहा हजार कोटींच्या रस्त्यांची कामे करत असल्याचं सांगितल जात आहे. रस्त्याच्या कामांच्या कंत्राटात गडबड झाली आहे. ही कंत्राटं मुंबईच नव्हे तर राज्याबाहेरील लोकांना दिली आहेत. मुद्दाम राज्याबाहेरच्या कंत्राटदारांना कंत्राटं दिल्याचा आरोप त्यांनी केला.

त्यातील अब्जावधी रुपयांचा भ्रष्टाचार समोर येऊ नये म्हणूनच परराज्यातील कॉन्ट्रॅक्टरला सर्व कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले आहेत. बाहेरच्या कॉन्ट्रॅक्टरला कामे दिल्यामुळे मुंबई संपूर्णपणे खणून ठेवण्यात आलेली आहे. यातील चारशे किलोमीटरच्या रस्त्यांची कामे सांगितली जातात. मात्र अवघी 38 किलोमीटरची सुद्धा रस्त्यांची कामे झाले नसल्याचा दावा त्यांनी केलाय.